SarjanSpandan

Search results

Saturday, May 29, 2021

शुभेच्छा

 #शुभेच्छा


      दाहीदिशांनी जेव्हा शुभेच्छा येऊ लागतात तेव्हा सारा आसमंत कसा सकारात्मक ऊर्जेने भरुन वाहू लागल्यासारखा वाटू लागतो. मला आठवते माझ्या लहानपणी पोस्टमन दिवाळीच्या आसपास १५ पैशांच्या कार्डावर लक्ष्मी गणपती सरस्वती यांची चित्रे असलेली शुभेच्छापत्रे देऊन जायचा तेव्हा काय आनंद व्हायचा. कितीतरी वेळ कितीतरी दिवस ते कार्ड न्याहाळण्यात जायचा. या दिवसात पोस्टमनवर अशी पोस्टकार्ड घरोघरी वाटण्याचे किती काम येऊन पडायचे पण ते आवर्जून सगळे कार्ड ज्याला त्याला पोहोचवायचे. त्यांना मग घरोघर फराळाचा आग्रह व्हायचा. प्रेमाने पोस्त दिली जायची.

 दूरवर कोठेतरी रहात असलेली मामा मावशी काका यांची ती शुभेच्छापत्रे असायची. ती नात्याची माणसे या कार्डातून अगदी जवळ आल्यासारखी वाटायची.

          आता ती पोस्टकार्डावरील शुभेच्छा दुर्मीळ झाली आहेत. ती आतुरता ती हुरहुर ते खंतावणे आता राहिलेले नाही. समाजमाध्यमांनी हे काम अगदी सोपे आणि आकर्षक करुन टाकले आहे. वाॅटसअॅप फेसबुकवर शुभेच्छांचा अक्षरशः पाऊस पडत राहतो.

           सुंदर शब्दांच्या पखरणी करुन, सुंदर सुंदर ओळींतून शुभेच्छा नखशिखांत नटून येत आहेत. काही पदरच्या तर काही एका ठिकाणाहून आलेल्या पुढे पाठवल्या जात आहे. एकामागून एक इतक्या शुभेच्छा येत आहेत की आपल्या नातेवाईक मित्रपरिवाराच्या या भरभरुन प्रेमात जणू चिंब भिजायला होत आहे.

        शुभेच्छा इतक्या येत आहेत की त्यांना जागा करुन देण्यासाठी जुन्या शुभेच्छा पुसून टाकाव्या लागत आहे. जसे एक रांगोळ्या पुसून दुसरी रांगोळी तितक्याच आवडीने घालावी तसे होत आहे.

       बरयाचदा त्याच त्या शुभेच्छा पुन्हा पुन्हा वर्षानुवर्षे वाचायची वेळ येत आहे. मग म्हणावेसे वाटते 'नेमीच येतो सणवार नेमीच शुभेच्छा अनावर!' मला आठवते अशा सणांचे औचित्य साधून मी एका अधिकारयाकडे हात मिळवून शुभेच्छा द्यायला जायचो तेव्हा ते म्हणायचे 'नुस्त्याच कोरड्या शुभेच्छा काय कामाच्या' आणि ते खरेही असायचे. सणावाराला शुभेच्छांचे भरभरुन वाहणारे आपले प्रेम इतरवेळी कुठे दडी मारुन बसते कुणास ठाऊक. ते अधिकारी नेहमी सांगायचे 'तुम्ही तुमचे काम आत्मियतेने चोखपणे केले, तुमच्या कामातून अन्याय दूर झाला, कोणाला न्याय मिळाला, कोणाचा उध्वस्त होणारा संसार वाचला, कोणाचे अश्रू पुसले गेले, कोणाच्या विवंचना मिटल्या तर त्या खरया शुभेच्छा ठरतील. महागडी नक्षीदार सुंदर ओळींची शुभेच्छापत्रे देण्यापेक्षा तुमचा मदतीचा हात द्या, काही नाही तर ख्यालीखुशाली विचारा, सुखदु:खे जाणून घ्या, खरया अर्थाने मैत्रभाव जागवा.. तरच तुमची शुभेच्छा खरया अर्थाने प्रवाही होऊन दुसर्‍याच्या अंतःकरणात समाधानाचे नंदनवन फुलविल.

       तुम्ही पाठवलेली शुभेच्छा उद्या कचरयात रुपांतरीत होऊन पुसून टाकायची वेळ यायला नको. किंवा तुम्ही पाठवलेली शुभेच्छा तुमच्या आधीच कोणीतरी पाठवलेली नसावी. सगळ्यात महत्वाचे म्हणजे शुभेच्छा पाठवणे हा केवळ उपचार म्हणून होता कामा नये.

खरया शुभेच्छा रोजच्या सहदय संवादात नकळत रुजल्या पाहिजे.. वाढल्या पाहिजे आणि फुलून मैत्रीच्या सुगंधात दर्वळल्या पाहिजेत!!!

सगळ्यात महत्वाचे म्हणजे तुमचा आत्मियता असलेला हसतमुख चेहरा आणि मदतीचे प्रेमाचे सौहार्द भाव हे कुठल्याही शुभेच्छा पत्रापेक्षा अधिक प्रभावी व खरे ठरणार आहेत!!! 

#विलास कुडके

No comments:

Post a Comment

अवघाची वेळ सुखाने घालवीन

 #अवघाची वेळ सुखाने घालवीन          वेळ घालवण्याचा प्रसंग  तुमच्यावर कधी आला आहे का ? कदाचित एकदम आठवणार नाही पण आपला क्रमांक येईपर्यंत, अपे...