SarjanSpandan

Search results

Sunday, August 8, 2021

अवघाची वेळ सुखाने घालवीन

 #अवघाची वेळ सुखाने घालवीन


         वेळ घालवण्याचा प्रसंग  तुमच्यावर कधी आला आहे का ? कदाचित एकदम आठवणार नाही पण आपला क्रमांक येईपर्यंत, अपेक्षित बसगाडी येईपर्यंत, अपेक्षित व्यक्तीची वाट पाहताना वेळ कसा घालवावा असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडलेला असेल. लहानपणी शाळा सुटायच्या आधी घंटा होण्याची वाट पाहताना वेळ जाता जात नाही याचा तुम्ही अनुभव घेतला असेल. एरव्ही भराभर सरणारा काळ त्यावेळी सरत कसा नाही या प्रश्नाने तुम्हाला भंडावून सोडलेले असते. उगाचच दोन्ही हातांच्या घड्या घालून वेगवेगळ्या कोनातून बदलून व कळ लागलेल्या पायांची अनावश्यक हालचाली करुन तुम्ही न जाणाऱ्या वेळेबद्दल बोटेही मोडून पाहिलेली असतील. उगाचच जांभाई दिलेली असेल. “श्या” या निरर्थक शब्दाने तुमच्या ओठांचा उंबरठा तुमच्या नकळत कितीदा ओलांडला असेल. हातात सैल पट्‌ट्याचे घड्याळ असेल तर उगाचच मनगट वर खाली करुन पाहिले असेल. हाताशी येईल ते गवत, फुल, पान उगाचच तोडून त्याच्याशी खेळून पाहिली असेल. इतकेच कशाला हाताशी एखादा दगड लागला असेल. तर तो जवळच्या जलाशयात फेकून सहज उठणाऱ्या गोल तरंगाकडे वेड्यासारखे पाहिले असेल. जलाशय नसेल तर हा हाताशी आलेला दगड कुठे भिरकवावा याही प्रश्नाने तुम्ही बुचकळ्यात पडला असाल. 

  वेळ जेव्हा भराभर सरतो तेव्हा कळत नाही. मात्र वेळ जाता जात नाही तेव्हा मात्र अगदी वेड्यासारखी अवस्था होऊन जाते. काहींना वेळ पुरत नाही तर काहींचा वेळ जाता जात नाही अशी विलक्षण परस्पर विरुध्द टोकाची विषमता सर्वत्र आहे. काहींना विनाकारण वेळ गमवावा लागतो. तर काही कमी वेळात उंच भरारी मारुन जातात. ज्यांनी कशाला तरी “वाहून” घेतले आहे. त्यांना वेळेचे भानही राहत नाही. प्रश्न पडतो तो ज्यांचा वेळ जाता जात नाही त्यांचा. तसे पाहिले तर आजकाल याही प्रश्नाची तीव्रता आंतरजाल, भ्रमणध्वनी इत्यादी वेगवान सुविधांमुळे कमी झाली आहे. तुमची कामे पूर्वी इतकी वेळखाऊ राहिलेली नसल्याने जास्तीत जास्त वेळ तुम्हाला घालवायला उपलब्ध झालेला आहे. 

  प्रदीर्घ प्रवास असेल तर लोक एकसारखे आडवे पडून झोपलेले तरी असतात. नाहीतर येईल ते वेफर्स, कुरकुरे, बिस्कीटे, चहा, कॉफी, आईस्क्रीम इत्यादीमध्ये आपल्या जीभेला गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न करीत असतात. प्रवास वेळ घालवण्याचा मोठा प्रश्न असतो. काही एकसारखे एका जागी बसता येत नाही म्हणून सतरा वेळा दरवाजापर्यंत ये-जा करीत असतात. तिथे वेगळी हवा लागते का ते पाहत असतात. ज्यांना कुठेही कोणत्याही अवस्थेत झोप लागू शकते. त्यांना वेळ कसा घालवावा हा प्रश्न अजिबात पडत नाही. अगदी रंगलेल्या गप्पा ऐकता ऐकता हो हो म्हणता ते सहज निद्रिस्त होऊन स्वप्ननगरीचा फेरफटका मारुन पुन्हा पुढच्या संवादाला टाळी द्यायला डोळा उघडून हजर होऊ शकतात.

  अचानक वीज गेल्यावर वेळ घालवणे अतिशय जिकरीचे असते. पंख्याने किंवा वातानुकूलित यंत्राने साथ देण्याचे सोडल्याने जी तडफडण्याची अवस्था असते ती अगदीच असह्य अशी असते. नैसर्गिक हवेची फारशी सवय नसलेल्यांची तर अशा वेळी हमखास पंचायत होऊन बसते. महागड्या अत्तराच्या वासात धर्मबिंदूंचा वास तसे सगळे विचित्र होऊन बसते. मग अशा वेळी उगाचच ती असेल तर ओढणीने पदाराने वारा घेत फेऱ्या मारणे किंवा तो असेल तेवढेच निमित्त साधून जागेवर पोबारा करणे असे चित्र हमखास पाहायला मिळते. जसे काही वीज गेली तर ती येईपर्यंत आपण जगूच शकत नाही असे किमानपक्षी ज्याला त्याला दाखवल्याशिवाय आपले समाधानच होत नाही. वीज गेलेली असूनही काहीच फरक न पडलेल्यांकडे मग सगळे अशा विचित्र नजरेने बघतात की तो माणूसही आपल्याला सहज मागील कित्येक शतकांपूर्वीचा मागासलेला वाटू लागेल. 

  आणखी एक वेळ जाता जात नाही असे ठिकाण म्हणजे जिथे मारायला एकही माशी नसते. हातपाय न हलवता गिळायची सोय असलेल्यांना न जाणाऱ्या वेळेची समस्या अधिक भेडसावते. काही ठिकाणी तर कामच नाही तेव्हा तर भयाण परिस्थिती असते. काम नसतांना आपण कामात आहोत असे पाहणाऱ्याला एकसारखे भासवत राहणे वाटते तितके सोपे काम नाही. सतत घड्याळाच्या काट्यावर नजर ठेवणे, हाताने काहीतरी खालीवर करत राहणे, संधी मिळाली की आंतरजालावर फिरून येणे, आपल्याला पत्ते गेम खेळता येतात की नाही त्याची चाचणी घेणे मात्र हे सर्व करीत असताना नाकावर सोनेरी काड्यांचा चष्मा असा काही सरकवून ठेवायचा व वर गंभीर मुद्रा करुन बसायचे पाहणाऱ्याला असे वाटेल की, ते जणू काही देशाचा अर्थसंकल्पच तयार करीत आहेत.  कोणाच्या लक्षात येणार नाही असा बेमालूम वेळ घालवणारा माणूस तुम्हाला कोठे दिसला तर त्याला गुरु मानले पाहिजे. कारण ज्याला वेळ घालवता आला तो जिंकला. नाहीतर मर-मर कितीही मेले तरी वेळ काही तुम्हाला हसायला, रडायला, गप्पा मारायला, चकाट्या पिटायला मोकळी संधी देणार नाही आणि तुम्ही त्या गोष्टींच्या अवर्णनीय आनंदापासून वंचितच राहाल. आपण या जगात येऊन काय केले हा प्रश्न ज्याला वेळ पुरत नाही त्यांच्यासाठी ठीक आहे. पण “इतके करुनही शेवटी काय मिळवले” असा प्रश्न शेवटपर्यंत पडू नये म्हणून वेळ घालवण्याची कला आत्मसात केलीच पाहिजे !

  वेळ घालवणे फारसे अवघड नसते. ज्यांचा अजिबात वेळ जात नाही असे मित्र तुम्ही जोडले पाहिजेत. त्यांच्याबरोबर   शॉपिंगला, रेसला, क्लबमध्ये, जिममध्ये अशा वेगवेगळ्या ठिकाणी जाण्याचे बेत आखले पाहिजेत. त्यांच्यावर वाट्टेल तेवढा पैसा उडवण्याची तुमची तयारी असली पाहिजे. कारण अशा मित्रांचा जर तुमच्यासोबत वेळ तऱ्हेने घालवला गेला नाही तर असे मित्र गमवण्याची वेळ तुमच्यावर येऊ शकते. पुन्हा पैसा असून वेळ कसा घालवावा असा प्रश्न तुम्हाला भेडसावू लागेल आणि असा प्रसंग शत्रूवरही येऊ नये. यासाठी वेळ घालवण्याची कला जमल्यास जन्मजात आत्मसात करण्याची निकड आहे. कामाचा उपदेश करणाऱ्यांकडे तुम्ही सोयीस्कर दुर्लक्ष करुन अशा मित्रांसोबत खुशाल चकाट्या पिटल्या पाहिजे, टिवल्या बावल्या केल्या पाहिजे, उणी-दुणी काढायला आजू-बाजूला खुप उदाहरणे असतात. तीही हौस या मित्रांसोबत तुम्ही भागवून घेतली पाहिजे. स्वत:ला चमकवायचे असेल तर इतरांवर गर्द अंधार करायला शिका. त्यासाठी वाट्टेल ते करा. लावालाव्या करा, चहाड्या करायला शिका कदाचित तुम्हाला हे पटणार नाही. पण त्याशिवाय तुमचा वेळ चवी-चवीने आनंदात जाणार नाही. तुम्हाला गंभीर आणि प्रौढ बनवणाऱ्या, डोक्यावरचे केस कमी करणाऱ्या किंवा अकाली डोक्यावर चांदी पेरणाऱ्या “जबाबदारी” “कर्तव्य” यासारख्या जड जड शब्दांपासून तुम्ही चार हात लांब असले पाहिजे. तसेच खूप गंभीर उपदेश करणाऱ्या लोकांपासून तुम्ही कोसभर दूर राहिले पाहिजे. मुळात तुमचा वेळ हा आनंद उपभोगण्यासाठीच आहे. एरंडाकडे पहा त्यांच्यासारखे वाढत रहा. हत्तीकडे पहा त्यांच्यासारखे मस्तवाल बना. इतरांची काळजी करण्यापेक्षा इतरांनी तुमची काळजी घेतली पाहिजे असे तुमचे इप्सित असले पाहिजे. एवढी कला आत्मसात करायला मात्र तुम्हाला थोडा वेळ वाया घालवण्याशिवाय गत्यंतर नाही !  

@विलास आनंदा कुडके

0 0 0 0 0  0

Tuesday, August 3, 2021

मैत्री आणि प्रेम

 *मैत्री आणि प्रेम....*


            ‘इक लब्ज मोहब्बत का अदनाई फसाना है, सिमटे तो मोती, फैले तो जमाना है’ असे एका शायराने प्रेमाबद्दल सुंदर लिहिले आहे.  एकाशी होते ते प्रेम आणि जगाशी होते ती मैत्री.  एकाच प्रेमाची ही दोन रुपं.  प्रेम आपल्या आयुष्यात वेगवेगळया वयात, वेगवेगळया रुपात प्रकटत असते.  पहिल्यांना जेव्हा आपण डोळे उघडतो तेव्हा आपल्या रडण्याची वाट पहात असलेल्या आईच्या डोळयातील आनंदाश्रूंच्या रुपाने दुग्ध धारांतून प्रेम भेटते.  वाकड्या वाटेवरुन सरळ रस्त्यावर शिस्तीत चालायला लावणाऱ्या बापाच्या धाकात आपल्यादा प्रेम भेटते.  ज्यांचे रुप, रंग वगैरे काहीही न पहाता आपले मन जुळते त्या मित्रांच्या/सवंगड्यांच्या रुसव्या फुगव्यात प्रेम भेटते.  राखी बांधून घेणाऱ्या भावाच्या मनगटात प्रेम भेटते.  कितीतरी अशी नाती.. अनामिकही.. आपल्याला प्रेम भेटतच असते. 


            प्रेम हा खरेतर एक समुद्र आहे.  सर्वत्र जीवनसाखळयांमध्ये प्रेम हीच प्रेरणा आहे.  मोराचा पिसारा फुलविणे असेल, सुगरणीचे घरटे बांधणे असेल, एखाद्या पक्षाचे शीळ घालणे असेल. सर्वत्र प्रेम आहे.  प्रेमाच्या या समुद्रातील एक थेंबसुद्धा आपण आपल्या आयुष्यात स्वीकारलेला नसतो.  आपली संकुचित दृष्टी हा प्रेमाचा असीम समुद्र पाहूच शकत नाही. 


            जोपर्यंत आपली मैत्री होत नाही, आपण प्रेमात पडत नाही तोपर्यंत मैत्री आणि प्रेम यात पुसटशी सीमारेषा आपण आखून घेत असतो.  ‘छे, छे, प्रेमात वगैरे नाही, आम्ही निव्वळ मित्र आहोत आणि केवळ मैत्री आहे’ असे आपण शंकेने पाहणाऱ्याला खुलासे करीत राहतो.  पण खरेच या दोन्ही गोष्टी वेगळया आहेत का?


            कोणी म्हणते आधी मैत्री होते आणि तीच प्रेमाची सुरुवात असते.  म्हणजे मैत्रीचे सुरवंट प्रेमाच्या फुलपाखरांमध्ये रुपांतरित होते.  प्रेम तुटू शकते, प्रेमभंग होऊ शकतो पण मैत्री अतूट असते.  मैत्री प्रेमाच्याही पलिकडे निरंतर राहते, असे आपल्याला वाटते.  प्रेमात माणूस ‘पडतो’ तर मैत्रीत तो ‘उभा’ राहतो.  प्रेम ‘शापित' असते.  जो प्रेमात पडेल त्याच्या विरोधात सगळी कायनात उभी राहते.  चौबाजूने विरोध, संघर्ष, संकटे यांना त्याला/तिला सामोरे जावे लागते.  प्रेमाचा सहजासहजी कोणत्याही समाजात स्वीकार होत नाही.  प्रचंड विरोध होतो.  प्रसंगी प्राणही गमवावे लागतात.  याउलट मैत्री एक अलौकिक देणगी ठरते.  जो प्रेमात पडला त्याने आपले सुख चैन गमावलेले असतात.  वर ज्याच्या प्रेमात पडला त्याचेही रंजोगम परेशानी तो मागून घेतो.  या प्रेमाचा शेवटही काय होतो.  “एक दुजे के लिए” या चित्रपट आला तो पाहून त्याकाळात कितीतरी प्रेमीयुगुलांनी आत्महत्या केल्या.  अलिकडेच “सैराट” सारख्या चित्रपटातूनही प्रेमाची शोकांतिका दाखवण्यात आलेली आहे.  प्रेमाचा सुखांत झाल्याचे एकही उदाहरण नाही.  प्रेमात शेवटी भंग, ताटातूट किंवा लग्न हे ठरलेलेच.  लग्न म्हणजे व्यवहार आणि व्यवहार आला की प्रेम कापरासारखे उडून जाणार हे ठरलेलेच.


आपल्याला आठवेल की लग्न जुळेपर्यंत व लग्न झाल्यानंतर नवखे दिवस इतकेच प्रेमाचे क्षण आपल्या आयुष्यात आलेले असतात.  नंतर संसाराचा रहाट गाडग्यात या प्रेमाचा कधी विसर पडतो आपल्याही लक्षात येत नाही.  संसाराचा गाडा ओढतांना दोघांना चाकांची भूमिका घ्यावी लागत असेल तर एकमेकांकडे पाहायला आयुष्यभर फुरसतही मिळत नाही.


            काहींच्या बाबतीत “चवळीची शेंग” पाहून झालेली प्रेमाची सुरुवात भोपळयात कधी रुपांतरित होते कळतही नाही.  रशियात “फुलदाणी”शी झालेले प्रेम, लग्नानंतर त्याचा ‘रांजण’ झाल्यावर त्यात फुलेही उरत नाही.  तो आणि ती यांच्यातील प्रेम तेवढे आपण प्रेम मानतो त्यामुळे प्रेम म्हटले की ‘छे छे आपण नाही बुवा’ म्हणून जो तो कानावर हात ठेवत असतो आणि तितकेच कुठे प्रेमाचा झरा, कवडसा मिळतो का त्याचा जगाच्या नजरा चुकवून शोधही घेत असतो.  काहीच मिळाले नाही तर कोल्‌हयासारखा आंबट चेहरा करुन म्हणतो की प्रेमाच्या वाटेला जायला नको!


            प्रेमाच्या आपल्या कल्पनाही धुर्कट झालेल्या, नंबर वाढलेल्या चष्म्यासारख्या असतात.  खऱ्या प्रेमापेक्षा लोक बेगडी प्रेमात हरवलेले असतात.  महागडे भेट देईल ते खरे प्रेम अशी आपली प्रेमाची स्वस्त व्याख्या असते.  कोणाकडून आपण अधिकाधिक सुखी होऊ असा शोध या प्रेमाच्या वाटेवर घेत असतो.  आपल्या प्रेमाला स्वार्थ चिकटलेला असतो.  त्या स्वार्थाची पूर्तता झाली नाही की प्रेमही उरत नाही.  पहिले प्रेम, दुसरे प्रेम अशा मालिका मग आपण करीतच राहतो.  एवढेही करुन खरे प्रेम आपण मिळवतो का?  तर नाही.  कारण खरे प्रेम आपण पाहिलेलेच नसते.  कल्पना करा स्वत: छिद्रे पडेपर्यंत एकच गंजीफ्रॉक वापरुन मुलाबाळांची हौस पुरवणारा भले कधी I Love You म्हणत नसेल, परिस्थितीमुळे कधी साधी वेणीही घेऊ शकत नसेल, रात्रंदिवस काबाडकष्ट करीत असताना साधी विचारपूसही करु शकत नसेल, जोडीदार येईपर्यंत उपाशी राहणारी ती असेल, पण त्या दोघात प्रेम नाही असे कसे म्हणता येईल.


            खऱ्या प्रेमाची ओळख नसल्यानेच “प्रेम भंग” ताटातूट, घटस्फोट होत राहतात.  पहिल्या नजरेत होईल ते प्रेम असे नसते.  सुखदु:खात एकमेकांसोबत एकमेकांचे होऊन जाणे, एकमेकांना आधार देत संसार करणे हेही प्रेमच म्हणावे लागेल.  जोडीदारासाठी आपल्या डोळयात अश्रू जपून ठेवते ते प्रेम.  प्रेम म्हणजे काय फक्त त्याचे आणि तिचेच असते का?  मुलीला सासरच्या मंडळीबरोबर पाठवणी केल्यानंतर मांडवात एकटाच कोपऱ्यात रडणारा बाप, जेवले असे खोटेच सांगून मुलासाठी टोपल्यात भाकर शिल्लक ठेवणारी आई, हक्काच्या साडीसाठी भावाबरोबर भांडणारी बहीण, शिकवता शिकवता घराचीही चौकशी करणारे गुरुजी, प्रेम कोठे नाही?  दोन मित्रांमध्येही असेत ते प्रेमच!  प्रेम सर्वव्यापक आहे.  आपल्या भोवतालचा निसर्ग, सृष्टी हीही नकळत जीव मात्रावर प्रेमच करीत असते.  एक आपणच असे असतो की जीवनाला वैतागतो, हैराण होतो.  आपले प्रेम फक्त स्वत:वर, स्वत:च्या गरजांवर असते.  निसर्गावर, सृष्टीवर उलट प्रेम करायला आपले हृदय तितके विशालही कधीच नसते. 


            मित्रप्रेम म्हटले की कृष्ण सुदाम्याचे उदाहरण दिले जाते आणि प्रेमाचे उदाहरण द्यायचे झाले तर राधा कृष्णाचे उदाहरण दिले जाते.  एकदा रुख्मिणीने रागाने कृष्णाला उष्ण दूध नेऊन देतांना विचारले “मिही तुमच्यावर प्रेम करते.  पण तुम्हाला मेले त्या राधेचेच कौतुक”  काय फरक आहे तिच्यात आणि माझ्यात.  कृष्ण म्हणाले “तूच जाऊन बघ फरक” तशी रुख्मिणी फणकाऱ्याने राधा जिथे होती तिथे महालात जाते.  तिला महालाच्या द्वाराशीच अतिशय सुंदर स्त्री दिसते.  रुख्मिणीला वाटते तिच राधा असावी.  पण ती निघाली तिची दासी.  दासीच जर इतकी सुंदर तर राधा किती सुंदर असेल या विचाराने ती अंत:पुरात राधेपर्यंत पोहोचते.  तो तेथील दासींची पळापळ सुरु असते आणि राधेच्या कोमल गळयावर आतून भाजल्यासारखे बाहेर व्रण उमटलेले होते.  दासींकडून कळाले की तिने सकाळी उठल्यापासून काहीच घेतलेले नव्हते.  तेव्हा रुख्मिणीला आठवले आपण कृष्णाला उष्ण दूध दिले होते.  मनोमन तिला ती आणि राधेतील फरक कळतो, अशी ती प्रेमाची कथा.  प्रेम अनंत प्रेम कथाही अनंत!  आपली प्रेमाची भूक ही खऱ्या प्रेमाची भूक नाहीच.  ती आहे आपल्या पंचेंद्रियांची भूक.  त्या पलिकडे आपल्या आत्म्याला कधीही भूक लागत नाही.  म्हणून आपण खऱ्या प्रेमापासून वंचित राहतो. 


            रवींद्रनाथ टॅगोर यांची ‘काबुलीवाला’, प्रेमचंद यांची ‘इदगाह’, एच.ई.बेट्स यांची ‘तिच्या हृदयाची हाक’, गाय दी मोपासा यांची ‘चंद्रिका’ यासारख्या साहित्यातून खऱ्या प्रेमाची ओळख अनेक साहित्यिकांनी करुन दिलेली आहे.  ज्ञानेश्वर माऊलींनी तर आपल्या पसायदानात ‘मैत्र जीवांचे’ मागितले आहे.  संत तुकडोजी महाराजांनी ‘मित्रा! कर मैत्री त्यासी जो सत्यविन शब्द न बोले सहजहि कोणासी/ सहनशीलता, सरळ वृत्तिची, वागणूक ज्याची/अपुले दु:ख न वदे कुणाला, चिंता इतरांची/चरित्र निर्मळ, राहणी साधी, निंदी न कवणासी, दिनचर्या सततची योग्य ती, हाव न मानाची, दिन दिनांची प्रगती करण्या, कमाल निष्ठेची’ असा मित्र जोडण्यासाठी सुचविले आहे.  मैत्री आणि प्रेमाबद्दल समाज माध्यमांमध्ये अनेक सुविचार मैत्री दिनाच्या निमित्ताने आपल्या वाचनात येतात.  त्यामध्ये मनाच्या इवल्याशा कोपऱ्यात काही जण हक्काने राज्य करतात त्यालाच तर मैत्री म्हणतात.  प्रेम ही सुंदर भावना आहे कारण ती हृदयातून येते पण मैत्री त्याहून अधिक सुंदर आहे कारण ती हृदयाला आधार देते.  एकमेकांसाठी जगणे यालाच “जीवन” म्हणतात, म्हणून त्यांना वेळ द्या जे तुमच्यावर स्वत:पेक्षा जास्त प्रेम करतात.  मनावरचं ओझं हलकं करण्याचे ठिकाण म्हणजे मैत्री!!!  असे कितीतरी सुविचार आपले मन सुखावून टाकतात.  मन उदात्त सुंदर करीत राहतात.  तरीही प्रेमाची आणि मैत्रीची परिपूर्ण व्याख्या अपूर्णच आहे.@विलास कुडके

अवघाची वेळ सुखाने घालवीन

 #अवघाची वेळ सुखाने घालवीन          वेळ घालवण्याचा प्रसंग  तुमच्यावर कधी आला आहे का ? कदाचित एकदम आठवणार नाही पण आपला क्रमांक येईपर्यंत, अपे...