SarjanSpandan

Search results

Sunday, August 8, 2021

अवघाची वेळ सुखाने घालवीन

 #अवघाची वेळ सुखाने घालवीन


         वेळ घालवण्याचा प्रसंग  तुमच्यावर कधी आला आहे का ? कदाचित एकदम आठवणार नाही पण आपला क्रमांक येईपर्यंत, अपेक्षित बसगाडी येईपर्यंत, अपेक्षित व्यक्तीची वाट पाहताना वेळ कसा घालवावा असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडलेला असेल. लहानपणी शाळा सुटायच्या आधी घंटा होण्याची वाट पाहताना वेळ जाता जात नाही याचा तुम्ही अनुभव घेतला असेल. एरव्ही भराभर सरणारा काळ त्यावेळी सरत कसा नाही या प्रश्नाने तुम्हाला भंडावून सोडलेले असते. उगाचच दोन्ही हातांच्या घड्या घालून वेगवेगळ्या कोनातून बदलून व कळ लागलेल्या पायांची अनावश्यक हालचाली करुन तुम्ही न जाणाऱ्या वेळेबद्दल बोटेही मोडून पाहिलेली असतील. उगाचच जांभाई दिलेली असेल. “श्या” या निरर्थक शब्दाने तुमच्या ओठांचा उंबरठा तुमच्या नकळत कितीदा ओलांडला असेल. हातात सैल पट्‌ट्याचे घड्याळ असेल तर उगाचच मनगट वर खाली करुन पाहिले असेल. हाताशी येईल ते गवत, फुल, पान उगाचच तोडून त्याच्याशी खेळून पाहिली असेल. इतकेच कशाला हाताशी एखादा दगड लागला असेल. तर तो जवळच्या जलाशयात फेकून सहज उठणाऱ्या गोल तरंगाकडे वेड्यासारखे पाहिले असेल. जलाशय नसेल तर हा हाताशी आलेला दगड कुठे भिरकवावा याही प्रश्नाने तुम्ही बुचकळ्यात पडला असाल. 

  वेळ जेव्हा भराभर सरतो तेव्हा कळत नाही. मात्र वेळ जाता जात नाही तेव्हा मात्र अगदी वेड्यासारखी अवस्था होऊन जाते. काहींना वेळ पुरत नाही तर काहींचा वेळ जाता जात नाही अशी विलक्षण परस्पर विरुध्द टोकाची विषमता सर्वत्र आहे. काहींना विनाकारण वेळ गमवावा लागतो. तर काही कमी वेळात उंच भरारी मारुन जातात. ज्यांनी कशाला तरी “वाहून” घेतले आहे. त्यांना वेळेचे भानही राहत नाही. प्रश्न पडतो तो ज्यांचा वेळ जाता जात नाही त्यांचा. तसे पाहिले तर आजकाल याही प्रश्नाची तीव्रता आंतरजाल, भ्रमणध्वनी इत्यादी वेगवान सुविधांमुळे कमी झाली आहे. तुमची कामे पूर्वी इतकी वेळखाऊ राहिलेली नसल्याने जास्तीत जास्त वेळ तुम्हाला घालवायला उपलब्ध झालेला आहे. 

  प्रदीर्घ प्रवास असेल तर लोक एकसारखे आडवे पडून झोपलेले तरी असतात. नाहीतर येईल ते वेफर्स, कुरकुरे, बिस्कीटे, चहा, कॉफी, आईस्क्रीम इत्यादीमध्ये आपल्या जीभेला गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न करीत असतात. प्रवास वेळ घालवण्याचा मोठा प्रश्न असतो. काही एकसारखे एका जागी बसता येत नाही म्हणून सतरा वेळा दरवाजापर्यंत ये-जा करीत असतात. तिथे वेगळी हवा लागते का ते पाहत असतात. ज्यांना कुठेही कोणत्याही अवस्थेत झोप लागू शकते. त्यांना वेळ कसा घालवावा हा प्रश्न अजिबात पडत नाही. अगदी रंगलेल्या गप्पा ऐकता ऐकता हो हो म्हणता ते सहज निद्रिस्त होऊन स्वप्ननगरीचा फेरफटका मारुन पुन्हा पुढच्या संवादाला टाळी द्यायला डोळा उघडून हजर होऊ शकतात.

  अचानक वीज गेल्यावर वेळ घालवणे अतिशय जिकरीचे असते. पंख्याने किंवा वातानुकूलित यंत्राने साथ देण्याचे सोडल्याने जी तडफडण्याची अवस्था असते ती अगदीच असह्य अशी असते. नैसर्गिक हवेची फारशी सवय नसलेल्यांची तर अशा वेळी हमखास पंचायत होऊन बसते. महागड्या अत्तराच्या वासात धर्मबिंदूंचा वास तसे सगळे विचित्र होऊन बसते. मग अशा वेळी उगाचच ती असेल तर ओढणीने पदाराने वारा घेत फेऱ्या मारणे किंवा तो असेल तेवढेच निमित्त साधून जागेवर पोबारा करणे असे चित्र हमखास पाहायला मिळते. जसे काही वीज गेली तर ती येईपर्यंत आपण जगूच शकत नाही असे किमानपक्षी ज्याला त्याला दाखवल्याशिवाय आपले समाधानच होत नाही. वीज गेलेली असूनही काहीच फरक न पडलेल्यांकडे मग सगळे अशा विचित्र नजरेने बघतात की तो माणूसही आपल्याला सहज मागील कित्येक शतकांपूर्वीचा मागासलेला वाटू लागेल. 

  आणखी एक वेळ जाता जात नाही असे ठिकाण म्हणजे जिथे मारायला एकही माशी नसते. हातपाय न हलवता गिळायची सोय असलेल्यांना न जाणाऱ्या वेळेची समस्या अधिक भेडसावते. काही ठिकाणी तर कामच नाही तेव्हा तर भयाण परिस्थिती असते. काम नसतांना आपण कामात आहोत असे पाहणाऱ्याला एकसारखे भासवत राहणे वाटते तितके सोपे काम नाही. सतत घड्याळाच्या काट्यावर नजर ठेवणे, हाताने काहीतरी खालीवर करत राहणे, संधी मिळाली की आंतरजालावर फिरून येणे, आपल्याला पत्ते गेम खेळता येतात की नाही त्याची चाचणी घेणे मात्र हे सर्व करीत असताना नाकावर सोनेरी काड्यांचा चष्मा असा काही सरकवून ठेवायचा व वर गंभीर मुद्रा करुन बसायचे पाहणाऱ्याला असे वाटेल की, ते जणू काही देशाचा अर्थसंकल्पच तयार करीत आहेत.  कोणाच्या लक्षात येणार नाही असा बेमालूम वेळ घालवणारा माणूस तुम्हाला कोठे दिसला तर त्याला गुरु मानले पाहिजे. कारण ज्याला वेळ घालवता आला तो जिंकला. नाहीतर मर-मर कितीही मेले तरी वेळ काही तुम्हाला हसायला, रडायला, गप्पा मारायला, चकाट्या पिटायला मोकळी संधी देणार नाही आणि तुम्ही त्या गोष्टींच्या अवर्णनीय आनंदापासून वंचितच राहाल. आपण या जगात येऊन काय केले हा प्रश्न ज्याला वेळ पुरत नाही त्यांच्यासाठी ठीक आहे. पण “इतके करुनही शेवटी काय मिळवले” असा प्रश्न शेवटपर्यंत पडू नये म्हणून वेळ घालवण्याची कला आत्मसात केलीच पाहिजे !

  वेळ घालवणे फारसे अवघड नसते. ज्यांचा अजिबात वेळ जात नाही असे मित्र तुम्ही जोडले पाहिजेत. त्यांच्याबरोबर   शॉपिंगला, रेसला, क्लबमध्ये, जिममध्ये अशा वेगवेगळ्या ठिकाणी जाण्याचे बेत आखले पाहिजेत. त्यांच्यावर वाट्टेल तेवढा पैसा उडवण्याची तुमची तयारी असली पाहिजे. कारण अशा मित्रांचा जर तुमच्यासोबत वेळ तऱ्हेने घालवला गेला नाही तर असे मित्र गमवण्याची वेळ तुमच्यावर येऊ शकते. पुन्हा पैसा असून वेळ कसा घालवावा असा प्रश्न तुम्हाला भेडसावू लागेल आणि असा प्रसंग शत्रूवरही येऊ नये. यासाठी वेळ घालवण्याची कला जमल्यास जन्मजात आत्मसात करण्याची निकड आहे. कामाचा उपदेश करणाऱ्यांकडे तुम्ही सोयीस्कर दुर्लक्ष करुन अशा मित्रांसोबत खुशाल चकाट्या पिटल्या पाहिजे, टिवल्या बावल्या केल्या पाहिजे, उणी-दुणी काढायला आजू-बाजूला खुप उदाहरणे असतात. तीही हौस या मित्रांसोबत तुम्ही भागवून घेतली पाहिजे. स्वत:ला चमकवायचे असेल तर इतरांवर गर्द अंधार करायला शिका. त्यासाठी वाट्टेल ते करा. लावालाव्या करा, चहाड्या करायला शिका कदाचित तुम्हाला हे पटणार नाही. पण त्याशिवाय तुमचा वेळ चवी-चवीने आनंदात जाणार नाही. तुम्हाला गंभीर आणि प्रौढ बनवणाऱ्या, डोक्यावरचे केस कमी करणाऱ्या किंवा अकाली डोक्यावर चांदी पेरणाऱ्या “जबाबदारी” “कर्तव्य” यासारख्या जड जड शब्दांपासून तुम्ही चार हात लांब असले पाहिजे. तसेच खूप गंभीर उपदेश करणाऱ्या लोकांपासून तुम्ही कोसभर दूर राहिले पाहिजे. मुळात तुमचा वेळ हा आनंद उपभोगण्यासाठीच आहे. एरंडाकडे पहा त्यांच्यासारखे वाढत रहा. हत्तीकडे पहा त्यांच्यासारखे मस्तवाल बना. इतरांची काळजी करण्यापेक्षा इतरांनी तुमची काळजी घेतली पाहिजे असे तुमचे इप्सित असले पाहिजे. एवढी कला आत्मसात करायला मात्र तुम्हाला थोडा वेळ वाया घालवण्याशिवाय गत्यंतर नाही !  

@विलास आनंदा कुडके

0 0 0 0 0  0

Tuesday, August 3, 2021

मैत्री आणि प्रेम

 *मैत्री आणि प्रेम....*


            ‘इक लब्ज मोहब्बत का अदनाई फसाना है, सिमटे तो मोती, फैले तो जमाना है’ असे एका शायराने प्रेमाबद्दल सुंदर लिहिले आहे.  एकाशी होते ते प्रेम आणि जगाशी होते ती मैत्री.  एकाच प्रेमाची ही दोन रुपं.  प्रेम आपल्या आयुष्यात वेगवेगळया वयात, वेगवेगळया रुपात प्रकटत असते.  पहिल्यांना जेव्हा आपण डोळे उघडतो तेव्हा आपल्या रडण्याची वाट पहात असलेल्या आईच्या डोळयातील आनंदाश्रूंच्या रुपाने दुग्ध धारांतून प्रेम भेटते.  वाकड्या वाटेवरुन सरळ रस्त्यावर शिस्तीत चालायला लावणाऱ्या बापाच्या धाकात आपल्यादा प्रेम भेटते.  ज्यांचे रुप, रंग वगैरे काहीही न पहाता आपले मन जुळते त्या मित्रांच्या/सवंगड्यांच्या रुसव्या फुगव्यात प्रेम भेटते.  राखी बांधून घेणाऱ्या भावाच्या मनगटात प्रेम भेटते.  कितीतरी अशी नाती.. अनामिकही.. आपल्याला प्रेम भेटतच असते. 


            प्रेम हा खरेतर एक समुद्र आहे.  सर्वत्र जीवनसाखळयांमध्ये प्रेम हीच प्रेरणा आहे.  मोराचा पिसारा फुलविणे असेल, सुगरणीचे घरटे बांधणे असेल, एखाद्या पक्षाचे शीळ घालणे असेल. सर्वत्र प्रेम आहे.  प्रेमाच्या या समुद्रातील एक थेंबसुद्धा आपण आपल्या आयुष्यात स्वीकारलेला नसतो.  आपली संकुचित दृष्टी हा प्रेमाचा असीम समुद्र पाहूच शकत नाही. 


            जोपर्यंत आपली मैत्री होत नाही, आपण प्रेमात पडत नाही तोपर्यंत मैत्री आणि प्रेम यात पुसटशी सीमारेषा आपण आखून घेत असतो.  ‘छे, छे, प्रेमात वगैरे नाही, आम्ही निव्वळ मित्र आहोत आणि केवळ मैत्री आहे’ असे आपण शंकेने पाहणाऱ्याला खुलासे करीत राहतो.  पण खरेच या दोन्ही गोष्टी वेगळया आहेत का?


            कोणी म्हणते आधी मैत्री होते आणि तीच प्रेमाची सुरुवात असते.  म्हणजे मैत्रीचे सुरवंट प्रेमाच्या फुलपाखरांमध्ये रुपांतरित होते.  प्रेम तुटू शकते, प्रेमभंग होऊ शकतो पण मैत्री अतूट असते.  मैत्री प्रेमाच्याही पलिकडे निरंतर राहते, असे आपल्याला वाटते.  प्रेमात माणूस ‘पडतो’ तर मैत्रीत तो ‘उभा’ राहतो.  प्रेम ‘शापित' असते.  जो प्रेमात पडेल त्याच्या विरोधात सगळी कायनात उभी राहते.  चौबाजूने विरोध, संघर्ष, संकटे यांना त्याला/तिला सामोरे जावे लागते.  प्रेमाचा सहजासहजी कोणत्याही समाजात स्वीकार होत नाही.  प्रचंड विरोध होतो.  प्रसंगी प्राणही गमवावे लागतात.  याउलट मैत्री एक अलौकिक देणगी ठरते.  जो प्रेमात पडला त्याने आपले सुख चैन गमावलेले असतात.  वर ज्याच्या प्रेमात पडला त्याचेही रंजोगम परेशानी तो मागून घेतो.  या प्रेमाचा शेवटही काय होतो.  “एक दुजे के लिए” या चित्रपट आला तो पाहून त्याकाळात कितीतरी प्रेमीयुगुलांनी आत्महत्या केल्या.  अलिकडेच “सैराट” सारख्या चित्रपटातूनही प्रेमाची शोकांतिका दाखवण्यात आलेली आहे.  प्रेमाचा सुखांत झाल्याचे एकही उदाहरण नाही.  प्रेमात शेवटी भंग, ताटातूट किंवा लग्न हे ठरलेलेच.  लग्न म्हणजे व्यवहार आणि व्यवहार आला की प्रेम कापरासारखे उडून जाणार हे ठरलेलेच.


आपल्याला आठवेल की लग्न जुळेपर्यंत व लग्न झाल्यानंतर नवखे दिवस इतकेच प्रेमाचे क्षण आपल्या आयुष्यात आलेले असतात.  नंतर संसाराचा रहाट गाडग्यात या प्रेमाचा कधी विसर पडतो आपल्याही लक्षात येत नाही.  संसाराचा गाडा ओढतांना दोघांना चाकांची भूमिका घ्यावी लागत असेल तर एकमेकांकडे पाहायला आयुष्यभर फुरसतही मिळत नाही.


            काहींच्या बाबतीत “चवळीची शेंग” पाहून झालेली प्रेमाची सुरुवात भोपळयात कधी रुपांतरित होते कळतही नाही.  रशियात “फुलदाणी”शी झालेले प्रेम, लग्नानंतर त्याचा ‘रांजण’ झाल्यावर त्यात फुलेही उरत नाही.  तो आणि ती यांच्यातील प्रेम तेवढे आपण प्रेम मानतो त्यामुळे प्रेम म्हटले की ‘छे छे आपण नाही बुवा’ म्हणून जो तो कानावर हात ठेवत असतो आणि तितकेच कुठे प्रेमाचा झरा, कवडसा मिळतो का त्याचा जगाच्या नजरा चुकवून शोधही घेत असतो.  काहीच मिळाले नाही तर कोल्‌हयासारखा आंबट चेहरा करुन म्हणतो की प्रेमाच्या वाटेला जायला नको!


            प्रेमाच्या आपल्या कल्पनाही धुर्कट झालेल्या, नंबर वाढलेल्या चष्म्यासारख्या असतात.  खऱ्या प्रेमापेक्षा लोक बेगडी प्रेमात हरवलेले असतात.  महागडे भेट देईल ते खरे प्रेम अशी आपली प्रेमाची स्वस्त व्याख्या असते.  कोणाकडून आपण अधिकाधिक सुखी होऊ असा शोध या प्रेमाच्या वाटेवर घेत असतो.  आपल्या प्रेमाला स्वार्थ चिकटलेला असतो.  त्या स्वार्थाची पूर्तता झाली नाही की प्रेमही उरत नाही.  पहिले प्रेम, दुसरे प्रेम अशा मालिका मग आपण करीतच राहतो.  एवढेही करुन खरे प्रेम आपण मिळवतो का?  तर नाही.  कारण खरे प्रेम आपण पाहिलेलेच नसते.  कल्पना करा स्वत: छिद्रे पडेपर्यंत एकच गंजीफ्रॉक वापरुन मुलाबाळांची हौस पुरवणारा भले कधी I Love You म्हणत नसेल, परिस्थितीमुळे कधी साधी वेणीही घेऊ शकत नसेल, रात्रंदिवस काबाडकष्ट करीत असताना साधी विचारपूसही करु शकत नसेल, जोडीदार येईपर्यंत उपाशी राहणारी ती असेल, पण त्या दोघात प्रेम नाही असे कसे म्हणता येईल.


            खऱ्या प्रेमाची ओळख नसल्यानेच “प्रेम भंग” ताटातूट, घटस्फोट होत राहतात.  पहिल्या नजरेत होईल ते प्रेम असे नसते.  सुखदु:खात एकमेकांसोबत एकमेकांचे होऊन जाणे, एकमेकांना आधार देत संसार करणे हेही प्रेमच म्हणावे लागेल.  जोडीदारासाठी आपल्या डोळयात अश्रू जपून ठेवते ते प्रेम.  प्रेम म्हणजे काय फक्त त्याचे आणि तिचेच असते का?  मुलीला सासरच्या मंडळीबरोबर पाठवणी केल्यानंतर मांडवात एकटाच कोपऱ्यात रडणारा बाप, जेवले असे खोटेच सांगून मुलासाठी टोपल्यात भाकर शिल्लक ठेवणारी आई, हक्काच्या साडीसाठी भावाबरोबर भांडणारी बहीण, शिकवता शिकवता घराचीही चौकशी करणारे गुरुजी, प्रेम कोठे नाही?  दोन मित्रांमध्येही असेत ते प्रेमच!  प्रेम सर्वव्यापक आहे.  आपल्या भोवतालचा निसर्ग, सृष्टी हीही नकळत जीव मात्रावर प्रेमच करीत असते.  एक आपणच असे असतो की जीवनाला वैतागतो, हैराण होतो.  आपले प्रेम फक्त स्वत:वर, स्वत:च्या गरजांवर असते.  निसर्गावर, सृष्टीवर उलट प्रेम करायला आपले हृदय तितके विशालही कधीच नसते. 


            मित्रप्रेम म्हटले की कृष्ण सुदाम्याचे उदाहरण दिले जाते आणि प्रेमाचे उदाहरण द्यायचे झाले तर राधा कृष्णाचे उदाहरण दिले जाते.  एकदा रुख्मिणीने रागाने कृष्णाला उष्ण दूध नेऊन देतांना विचारले “मिही तुमच्यावर प्रेम करते.  पण तुम्हाला मेले त्या राधेचेच कौतुक”  काय फरक आहे तिच्यात आणि माझ्यात.  कृष्ण म्हणाले “तूच जाऊन बघ फरक” तशी रुख्मिणी फणकाऱ्याने राधा जिथे होती तिथे महालात जाते.  तिला महालाच्या द्वाराशीच अतिशय सुंदर स्त्री दिसते.  रुख्मिणीला वाटते तिच राधा असावी.  पण ती निघाली तिची दासी.  दासीच जर इतकी सुंदर तर राधा किती सुंदर असेल या विचाराने ती अंत:पुरात राधेपर्यंत पोहोचते.  तो तेथील दासींची पळापळ सुरु असते आणि राधेच्या कोमल गळयावर आतून भाजल्यासारखे बाहेर व्रण उमटलेले होते.  दासींकडून कळाले की तिने सकाळी उठल्यापासून काहीच घेतलेले नव्हते.  तेव्हा रुख्मिणीला आठवले आपण कृष्णाला उष्ण दूध दिले होते.  मनोमन तिला ती आणि राधेतील फरक कळतो, अशी ती प्रेमाची कथा.  प्रेम अनंत प्रेम कथाही अनंत!  आपली प्रेमाची भूक ही खऱ्या प्रेमाची भूक नाहीच.  ती आहे आपल्या पंचेंद्रियांची भूक.  त्या पलिकडे आपल्या आत्म्याला कधीही भूक लागत नाही.  म्हणून आपण खऱ्या प्रेमापासून वंचित राहतो. 


            रवींद्रनाथ टॅगोर यांची ‘काबुलीवाला’, प्रेमचंद यांची ‘इदगाह’, एच.ई.बेट्स यांची ‘तिच्या हृदयाची हाक’, गाय दी मोपासा यांची ‘चंद्रिका’ यासारख्या साहित्यातून खऱ्या प्रेमाची ओळख अनेक साहित्यिकांनी करुन दिलेली आहे.  ज्ञानेश्वर माऊलींनी तर आपल्या पसायदानात ‘मैत्र जीवांचे’ मागितले आहे.  संत तुकडोजी महाराजांनी ‘मित्रा! कर मैत्री त्यासी जो सत्यविन शब्द न बोले सहजहि कोणासी/ सहनशीलता, सरळ वृत्तिची, वागणूक ज्याची/अपुले दु:ख न वदे कुणाला, चिंता इतरांची/चरित्र निर्मळ, राहणी साधी, निंदी न कवणासी, दिनचर्या सततची योग्य ती, हाव न मानाची, दिन दिनांची प्रगती करण्या, कमाल निष्ठेची’ असा मित्र जोडण्यासाठी सुचविले आहे.  मैत्री आणि प्रेमाबद्दल समाज माध्यमांमध्ये अनेक सुविचार मैत्री दिनाच्या निमित्ताने आपल्या वाचनात येतात.  त्यामध्ये मनाच्या इवल्याशा कोपऱ्यात काही जण हक्काने राज्य करतात त्यालाच तर मैत्री म्हणतात.  प्रेम ही सुंदर भावना आहे कारण ती हृदयातून येते पण मैत्री त्याहून अधिक सुंदर आहे कारण ती हृदयाला आधार देते.  एकमेकांसाठी जगणे यालाच “जीवन” म्हणतात, म्हणून त्यांना वेळ द्या जे तुमच्यावर स्वत:पेक्षा जास्त प्रेम करतात.  मनावरचं ओझं हलकं करण्याचे ठिकाण म्हणजे मैत्री!!!  असे कितीतरी सुविचार आपले मन सुखावून टाकतात.  मन उदात्त सुंदर करीत राहतात.  तरीही प्रेमाची आणि मैत्रीची परिपूर्ण व्याख्या अपूर्णच आहे.@विलास कुडके

Friday, July 23, 2021

गुरु पौर्णिमा

 #गुरु पौर्णिमा


        आईसोबत कानमंत्र घेतला ते नाथपंथी केशवपुरी गोसावी महाराज मला आज आठवतात. मधुकर चित्रमंदिर टाॅकीजमागे विश्रामबागेत एक छोट्याशा खोलीत धुनी व जवळच सप्तशृंगी मातेची व्हितभर पितळी मूर्ती असलेला छोटा देव्हारा. तिथेच ते भक्तशिष्य यांच्यासाठी आसनावर बसलेले असायचे. ते संन्यासी नव्हते. संसारी होते. त्यांना ब्रिटाॅल सिगारेट लागायची. देवी भक्त होते. सप्तशतीची कितीतरी अनुष्ठाने आणि पारायणे त्यांनी केलेली होती. काही भक्तांच्या घरी जाऊन ते नवचंडी वगैरे पूजा करायचे. अर्धी भगवी कोपरी. दोन्ही कानांवर भरगच्च केस. दाढी मिशी काढलेली. एकटांगी धोतर असा त्यांचा वेष असायचा. ते नाशिकरोडला शिखरे गल्लीत रहायचे. दत्त जयंती, गुरु पौर्णिमा या उत्सवप्रसंगी सर्व भक्तमंडळींना ते शिखरेवाडीतील घरी दर्शन उपदेश द्यायचे.

              केशवपुरी गोसावी संसारी होते. नाशिकरोडला प्रेसमध्ये होते. गोसावी वाडीत त्यांचे घर होते. ते भक्तांसाठी विश्राम बागेत यायचे. छोटीसी खोली होती. धुनीजवळ देव्हारयात सप्तशृंगीची पितळी मूर्ती होती. ते बसायचे तिथे पाठीमागे त्यांच्या गुरुची तसबीर होती. तसबीरीत भगव्या वेशात दाढी वाढवलेले ते नाथपंथी साधू होते. केशवपुरी महाराज ब्रिस्टॉल सिगारेट ओढायचे. येणाऱ्या भक्तांना आयुर्वेदीक औषधे विनामोबदला द्यायचे. सप्तशतीचे पाठ करायचे. तेवढ्याशा खोलीत भिंतीवर सगळ्या देवदेवतांच्या तसबीरी लावून ठेवलेल्या होत्या. त्रिकाळ ते सर्व देवांना धूप अगरबत्ती करायचे. गुरुवारी भक्तांची गाऱ्हाणी ऐकून उपाय सांगायचे. त्यांच्या अंगात भगवे जाकीट आणि धोतर असा वेष असायचा. दाढी केलेली असायची. त्यांच्या कानावर दाट केस होते. त्यांच्या पायावर डोके ठेवायला आई सांगायची. वडीलही बरोबर असायचे. तेही त्यांच्या पायावर डोके ठेवायचे. एके दिवशी त्यांनी आम्हा सर्वांना अनुग्रह दिला. मला गुरुसाठी फळ सोडायला सांगितले तेव्हा मी म्हटले नारळ तेव्हा म्हणाले नारळ नको. मग तुला प्रसाद खाता येणार नाही. कसेबसे सगळी फळे आठवून शेवटी मी रामफळ सोडले. गुरुपौर्णिमेला गोसावी वाडीत त्यांचा मोठा उत्सव असायचा. त्या दिवशी ते सर्व जमलेल्या भक्तांना अध्यात्मिक उपदेश करायचे. मालपुव्याचा प्रसाद द्यायचे. तेव्हा मला गुरु म्हणजे काय ते तितकेसे कळत नव्हते. त्यांनी एकदा विचारले तू गुरु का केला. मी म्हटलं मला ब्रम्ह ज्ञान हवे. आईकडून ऐकलेला शब्द तेव्हा मी उच्चारला तेव्हा ते माझ्या लहान वयाकडे पाहून नुस्तेच हसले होते. माझे वय अकरा बारा वर्षांचे असेल. मेनरोडवरील रत्नांच्या दुकानात त्यांचा मोठा कृष्णधवल फोटो मिळायचा. त्यांच्या नाथपंथी गुरुचा फोटो ते बसायचे तिथेच मागे लावलेला होता. त्या एवढ्याशा खोलीत सगळ्या भिंतींना वेगवेगळ्या देवी देवतांच्या तसबीरी लावून ठेवलेल्या होत्या. आयुर्वेदाचा त्यांचा चांगला अभ्यास होता. ते भक्तांना उपचारासाठी आयुर्वेदीक गोळ्या भस्म इ. द्यायचे. ते सर्व सेवार्थ असायचे. एका लाकडी कपाटात धार्मिक पुस्तके ग्रंथ होते. मला काही समजत नसताना एकदा मी त्यांना मला ब्रम्हज्ञान हवे असे म्हटले तर ते माझ्या लहान वयाकडे पाहून नुसतेच हसले होते. आजच्या दिवशी त्यांचा एक फोटो देखील माझ्याकडे नाही. तो कुठे मिळत नाही. पण गुरुचरणी शत शत नमन आहे

@विलास आनंदा कुडके 

Friday, July 16, 2021

नवीन चष्मा

 #नवीन चष्मा


           चष्मा कधी लागला ते आता आठवत नाही. पण तेव्हा प्रचंड डोके दु:खायचे. कारण कळत नव्हते. डाॅक्टरांकडे दाखवले. त्यांनी गोळ्या लिहून दिल्या. गोळ्यांनी फरक नाही पडला तर डोळे तपासून घ्या असा सल्ला दिला. झालं. गोळ्या घेऊनही फरक पडला नाही. मग डोळे दाखवले. मायनस असा काहीसा नंबर होता. चष्मा बनवायला टाकला. तेव्हा मी नुकताच मंत्रालयात रुजू झालेलो होतो. एका सोमवारी मी चष्मा लावून हजर झालो तर सगळे काहीतरी नवीनच पाहतोय अशा नजरेने पाहू लागले. मला सगळ्यांच्या नजरा चुकवता येईना. दिवसभर माझ्या चष्म्याची.. दिसण्याची चर्चा होत राहिली. प्रशासन भवनमधून मंत्रालयात जाताना सिग्नल ओलांडताना मी चष्म्यातून रस्त्याकडे पहात होतो तर सगळे खालीवर दिसत होते आणि मी नक्की रस्त्यावरच पाय टाकतो ना ते चष्म्यातून पायांकडे पाहून खात्री करुन घेत होतो.

        बाॅसच्या दालनात मी चष्म्यासह प्रथमच प्रवेश केला तर बाॅसने देखिल क्षणभर चष्म्यातील माझे नवीन ध्यान पाहिले आणि 'चालायचेच' अशा नजरेने कामकाजाच्या सूचना दिल्या. दिवसभर मी कार्यालयातील स्वच्छतागृहात वारंवार जाऊन 'आपण चष्म्यावर कसे दिसतो ते पाहून घेतले' रात्री नवीन चष्म्यासह घरी प्रवेश केला तर घरच्यांनाही तो खूप आवडला. तसे पाहिले तर मी अनेकांना त्यावेळी मी चष्म्यावर पाहिले होते. चष्मा लावलेली मुले मुली अधिक बुद्धीवान आणि हुशार वाटायची. वाटायचे एकसारखे पुस्तकात डोके खुपसून या मंडळींना चष्मा लागला असावा. पहावा तेव्हा त्यांच्या चेहर्‍यावर अभ्यास आणि अभ्यासच दिसायचा. चष्म्याचा एक फायदा म्हणजे खरे डोळे कसे ते कुणाला कळतच नाही. चष्मा काढून डोळे चोळताना कुणाला पाहिले की चष्म्यातील डोळ्यांपेक्षा नुसते डोळे वेगळेच टोपसलेले भासायचे.

            काही व्यक्तिमत्त्वे केवळ चष्म्यावरुन ओळखू यायची. महात्मा गांधीजींचा गोल काचेचा चष्मा. पु ल देशपांडे यांचा काळ्या फ्रेमचा मोठा चौकोनी चष्मा. त्रिं च्य खानोलकरांचा तसाच चष्मा. जी ए कुलकर्णींचा काळ्या काचांचा चष्मा.अॅन्टान चेखव यांचा गळ्यात दोरी असलेला चष्मा, नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा चष्मा. खुद्द वडीलांचा साधा तपकीरी रंगाचा गोल भिंगाचा चष्मा जो त्यांनी आयुष्यात बदलला नाही. एक काडी तुटली तर त्या जागी पांढरा दोरा बांधून शेवटपर्यंत तोच चष्मा वापरला. कितीतरी चष्मे एक ओळख बनून गेले. शोर चित्रपटातील राजेश खन्नाचा चष्मा तर एक नवीन फॅशन आणायला कारणीभूत झाला.

           चष्मेबद्दूर सिनेमा लागला तेव्हा आम्हाला वाटले काहीतरी चष्मा लावलेल्या बहाद्दरचा सिनेमा असेल पण चष्मेबद्दूर वेगळाच निघाला.

        'ए चष्मिष्ट' असे चिडवायला तेव्हा खूप आवडायचे. ज्याला हाक मारली तो मग चष्म्यातून असेकाही रागाने पाहायचा की विचारता सोय नाही. पण स्वतःलाच चष्मा लागल्यावर मग गंभीर चेहरा झाला. चष्म्यामुळे पोक्त अनुभवी नजर आल्यासारखे वाटले. गप्पा गोष्टी विनोद हसणे खिदळणे यावर चष्म्यामुळे दिवसेंदिवस मर्यादा येत गेल्या. वाढत्या वयाची जाणीव रोपट्यासारखी वाढीस लागली आणि पुढे पुढे त्या जाणिवेचा केव्हा वटवृक्ष झाला कळलेच नाही. सोनेरी काड्यांच्या चष्म्याची हौस असलेले आणि डोक्यावर फरची कॅप असलेले काही माणसे तेव्हा पाहिली होती.

          अनेकदा आरशात वेगवेगळ्या चष्म्यात स्वतःला पाहण्याचा छंद असलेली माणसे पाहिली. चष्मा म्हणजे नजरिया नवीन सोच असेही परिमाण आहे. तारक मेहता का उलटा चष्मा सारख्या मालिकेतून नवीन दृष्टी देण्याचा प्रयत्न झाला. जसा चष्मा तसे दिसेल असे म्हटले जाते ते उगाच नाही

         अनेक लोकांना आपल्याला चष्मा लागलेला आहे हे दाखवायला आवडत नाही. मग हे लोक हळूच आतल्या खिशातून चोरुन चष्मा काढून नाकावर ठेवून पटकन काम करुन घाईघाईने पुन्हा लगबगीने खिशात ठेवून देताना पाहिले की मोठी गंमत वाटते. लेखापरीक्षकाचा चष्माही असाच गंमतीदार. मोठ्या नाकावर इवलासा अगदी खाली लावलेला छोटा चष्मा लावून ते मोठमोठे रजिस्टर कसे काय तपासता याचेच कौतुक वाटते.

         चष्म्याचा आणखी एक फायदा काही लोक घेताना दिसतात. बाॅस जेव्हा झापत असतो तेव्हा बाॅसच्या डोळ्याला डोळा भिडविण्याची कुणाची टाप नसते पण चष्मा लावला की जणू तो ढालच आहे असे समजून त्यातून सरळ पाहण्याचे धाडसही काही करु शकतात.

         अनेकदा मी घरी चष्मा विसरायचो किंवा ऐनवेळी चष्म्याची काडी तुटायची. अशावेळी मग कार्यालयात दोन दोन चष्मे ठेवत असलेल्या सावंताचा जाड भिंगाचा साधारणतः माझ्या नंबरपेक्षा जास्त नंबरचा चष्मा माझ्या उपयोगी पडायचा. गरजेला उपयोगी पडतो तो मित्र Friend in need is indeed या उक्तीप्रमाणे सावंतांबरोबर त्यांचा चष्माही मला माझा मित्र वाटायचा. उगाच नाही चष्म्याला 'पेरुचाच पापा' मध्ये स्थान मिळालेले आहे.

         कधी बाॅस चष्मा विसरुन आले की त्या दिवशी फाईली तिष्ठत टेबलावर साचायच्या आणि मग डोळे मिटून बाॅसला चिंतन करायला अधिक वेळ मिळायचा. त्या दिवशी बाॅसचे दालन वातानुकूलित यंत्र बंद ठेवले तरी थंड राहील असे वातावरण असायचे.

       चष्मा हा काही लोकांच्या जीवनशैलीचा भाग झालेला दिसून येतो. भाषण करताना हमखास चष्मा हातात घ्यायची व अधिक जटील विचार मांडायचा असेल तर चष्म्याची काडी तोंडात ठेवायची काहींची अगदी हमखास शैली असते. काही लोक तर कोणाला अधिक समजावायचे असेल तर तावातावाने चष्मा काढून डोळे वटारुन अक्षरशः दुसर्‍याच्या अंगावर जवळजवळ धावूनच जातात.

        बराचवेळ चष्मा लावून लिहितोय. डोळ्यांना विश्रांती दिली पाहिजे म्हणून जरा थांबतो!

        नवीन चष्मा आहे. काचा नवीन असल्या तरी नव्या कोऱ्या मुलायम कपड्याने पुन्हा पुन्हा पुसून दाखवून देतो की चष्मा नवीन घेतला आहे. प्रोगेसिव्ह ग्लासचा आहे. म्हणजे लांबचे आणि जवळचे पाहण्यासाठी एकच भिंग. 'नवीन नवीन सराव होईपर्यंत जरा नवीन वाटेल. लांबचे पहा पण जास्त लांबचेही पाहू नका' असा प्रेमळ सल्ला लक्षात ठेवून मी जरा नवीन चष्म्याची सवय करुन घेतो... तोपर्यंत तुम्हीही चष्म्याची विविध रुपे, शैली, रंग यांचा विचार करायला हरकत नाही

@विलास आनंदा कुडके

Thursday, July 1, 2021

डाॅक्टर म्हणजे देव

 *डाॅक्टर म्हणजे देव*


         जन्मापासून मरेपर्यंत एकच देव आपल्याला सातत्याने साथ देत असतो आणि तो म्हणजे डाॅक्टर! लहानपणी या देवाला मी अतिशय घाबरायचो. मला आठवते, कुठूनतरी कर्णोपकर्णी वार्‍यावर झोप उडवणारी वार्ता आली की चौकातील भेंडीखाली लस द्यायला डाॅक्टर आलेले आहेत आणि ते गल्लीतील एकेक पोराला बखोटे धरुन उचलून उचलून तिथे नेत आहेत. झाले जो तो पोर इकडे लप तिकडे लप असा लपू लागला. त्यात मीही होतो. लांबूनच बघितले तर भेंडीखाली डाॅक्टरांच्या कचाट्यात सापडलेली पोरं दंडावरच्या डागण्यांनी अक्षरशः गुरासारखी ओरडत होती, थई थई नाचत पाय झाडत होते. ते पाहून तर छातीत धस्स झालेले होते. लपायच्या नादात कुठूनतरी आई शोधत शोधत आली. तिने जवळजवळ झडपच घालून मला पकडले आणि ओढत ओढत भेंडीखाली डाॅक्टरांकडे घेऊन गेली. मरण जवळ आलेल्या डुकरासारखी माझी अवस्था झालेली होती. नाही नाही म्हणेपर्यंत आईने मला त्या डाॅक्टराच्या स्वाधीन केले तेव्हा मनात म्हटले आता संपले सगळे. तिथे बघितले तर स्टोववर छोट्या पातेल्यात पाणी थपथप उकळत होते. त्यात भल्यामोठ्या सुया बुडवून ठेवलेल्या होत्या. एकेक पोराला उचलून उचलून आणणे सुरुच होते. कोणीतरी दंड धरुन ठेवला आणि त्यावर गरम सुई जवळ जवळ डागली तसा मी गुरासारखा ओरडलो. ती खूण अजूनही दंडावर आहे. कळत नव्हते त्या वयातील हे सर्व दिव्य होते. नंतर कळाले की ती देवीची लस होती. ती घेतली नसती तर तोंडावर अंगावर देवीचे फोड येऊन चांगले मोठमोठे व्रण पडले असते. आज कळते की त्यावेळी कटू व कठोर निर्दयी वाटलेले डाॅक्टर देवच होते.

      जस जसं वय वाढत होते तस तसे डाॅक्टरांचे भय वाढतच होते. कधी तापाने फणफणलो की तापापेक्षा मला सुईची भीती वाटू लागायची आणि मग दरदरुन घाम फुटायचा. नको नको म्हणत असतानाही आई मला डाॅक्टरकडे घेऊन जायची. बरं डाॅक्टरही असा एक पेशंट झाला की उभे राहून दुसर्‍या येणाऱ्या पेशंटसाठी सुई भरायच्या तयारीला लागायचा. अशी तयारी करीत असतानांच त्याच्याकडे जायची वेळ आली की पेशंटला पाहून डाॅक्टरला आणखीच उत्साह आलेला दिसायचा. गोळ्या औषधेच द्या असे बजावलेले असताना डाॅक्टर हटकून इंजेक्शनच द्यायचे आणि मग हट्टी ताप घरी जाईपर्यंतच झरकन उतरुन जायचा. तर अशारितीने बालपणात डाॅक्टरांचा मी धसका घेतलेला होता.

      गल्लीत एक दंतवैद्याचा दवाखाना होता. काचेच्या शोकेसमध्ये कवळ्या औषधांच्या बाटल्या मांडून ठेवलेल्या असायच्या. मित्र सांगायचे तिथे वैद्य म्हणे दात उपटून काढत असतात म्हणून घाबरुन मी तिथून पळ काढायचो. न जाणो वैद्य मागे लागायचा आणि दात उपटून घ्यायचा अशी भीतीही त्यावेळी वाटायची.

       घरात त्यावेळी दम द्यायचा असला की 'थांब तुला डाॅक्टरकडेच घेऊन जाते आणि मोठ्ठी सुई मारायला सांगते' असा सज्जड दम भरला जायचा.नंतर दरवर्षी जसा पाऊस सुरु व्हायचा तसा दवाखाना ठरलेला असायचा. १९९० मध्ये अतिदगदगीने मी आजारी पडलो. वजन भराभर कमी होत गेले आणि अवघे ४६ किलो वजन झाले. डाॅक्टरचे नाव घेतले की मी हमखास नाही म्हणायचो. सहज फिरायला जाऊ म्हणून सासूबाईंनी हळूच मला नाशिकरोडच्या शिवगंगा हाॅस्पिटलला नेले. स्वतःला दाखवायच्या बहाण्याने हळूच डाॅक्टरांचा मोर्चा त्यांनी माझ्याकडे वळवला आणि मग मला घरच्यांचा कावा लक्षात आला. पण माझा नाईलाज होता. डाॅक्टरांनी मनसोक्त तपासणी केली आणि सांगितले की यांना लगेच हाॅस्पिटलमध्ये दाखल करुन घेतो.झालं. माझ्या डोळ्यापुढे तारे चमकले. सलग इंजेक्शनचे कोर्स सुरु केले. लोह वाढीच्या गोळ्या आणि टाॅनिकचा मारा सुरु झाला. रोज आलटून पालटून इंजेक्शन होते त्यामुळे मी अगदी जेरीस आलो. डाॅक्टरांच्या त्यावेळच्या प्रयत्नांमुळे मी मोठ्या गंभीर आजारातून बरा झालो. त्याबळावर मी मुंबईला अपडाऊन करुन सलग ३१ वर्षे सेवा केली. शेवटी शेवटी नोव्हेंबर २०१८ मध्ये मला हृदयविकाराचा तीव्र झटका आला. मला तातडीने जे. जे हाॅस्पिटलमध्ये दाखल व्हावे लागले. अॅन्जिओग्राफी व अ‍ॅन्जिओप्लास्टी झाली आणि पुन्हा एकदा डाॅक्टरांनी मला जीवनदान दिले. माझ्या या गंभीर जीवनमरणाच्या क्षणी डाॅक्टर देव म्हणून उभे राहिले.

      इगतपुरी पाऊसाचे माहेरघर. तिथे तर मुले लहान असताना मला पावसाळ्यात हमखास डाॅक्टरांकडे धावपळ करावी लागायची. तेथील डाॅक्टर मी पहायचो अगदी अल्प फी मध्ये स्वस्त औषध लिहून देऊन बरे करायचे. पाठीवर स्टेथोस्कोप लावून नाडीचे ठोके मोजून ते अचूक निदान करायचे. त्यांच्याकडे बहुतांश आदिवासी उपचार घ्यायला येत असायची. एकदा मी बघितले एक आदिवासी आजी फि द्यायला म्हणून कमरेला पिशवीत चाचपडत होती. कशीबशी तिने जेव्हा घडीघडीची दोन रुपयांची नोट काढली तेव्हा तिच्याकडे पाहून डाॅक्टर म्हणाले 'राहू द्या आजी. आधी बर्‍या व्हा.' आणि एवढे बोलून त्यांनी आपल्या जवळची औषध गोळ्या तिला दिल्या व कसे वाटते ते दाखवायला परत या म्हणून बजावले. फी नसली तरी चालेल असेही सांगितले. असेही माणूसकी असलेले डाॅक्टर मी इगतपुरीमध्ये पाहिले.

     आजच्या कोरोनाच्या जीवघेण्या वातावरणात डाॅक्टर स्वतःच्या जीवावर उदार होऊन रुग्णांचे जीव वाचवत आहेत. अनेकांच्या आयुष्यात डाॅक्टर देवासारखा धावून जात आहे. अशा या देवाला कोटी कोटी प्रणाम!!!

@विलास आनंदा कुडके

*न्यूज स्टोरी टुडे*

*०१.०७.२०२१*

*डॉक्टर दिन विशेष*


*- डॉक्टर म्हणजे देव* 

*✒️ टीम एनएसटी*  👇

http://www.marathi.newsstorytoday.com/डॉक्टर-म्हणजे-देव/

Sunday, June 20, 2021

एका चंदनाची कहानी

 #एक चंदनाची कहानी

            खूप एकटे एकटे वाटले की आठवणी सोबतीला येतात आणि साथ देतात. आठवणी आल्या की पाठोपाठ घळाघळा अश्रू येतात. अंधार त्या अश्रूंवर मायेने पांघरुन घालतो. अन त्या पांघरुनात हुंदकेही येतच राहतात. डोळ्यात झोप येत नाही तेव्हा आठवणीच स्वप्नांसारख्या तरळत राहतात. दिसतात पण त्यांना स्पर्श करु शकत नाही म्हणून शब्दात त्या गुंफून ठेवाव्या लागतात. कोणी म्हणेल कशासाठी या आठवणी. आठवणी या पुढील पिढीसाठी लिहून ठेवायच्या असतात. वाडवडिलांनी कसा संघर्ष केला आणि आपण कोणत्या अनुभवांचे वारसदार आहोत हे जर जाणून घ्यायचे असेल तर याच आठवणींना चाचपडून पहावे लागेल

      ते जून १९७६ ला सेवानिवृत्त झाल्यानंतर १७/११/२००२ पर्यंत त्यांचा तब्बल २६ वर्षांचा सहवास लाभला. सेवानिवृत्त झाल्यानंतर पेन्शन नव्हते. मला १९७८ ला नोकरी शोधावी लागली. १९८० ला मी ज्या रेडिमेड कपड्याच्या दुकानात कामाला होतो त्या दुकान मालकाची परवानगी घेऊन ११वी काॅमर्सला के टी एच एम काॅलेजला प्रवेश घेतला. सकाळी १०.३० पर्यंत पिरीएड अटेंड करुन मी दुकानात जायचो.

        ३० रुपये आठवड्याला उचल मिळायची. वडील त्यातून गहू तर गहूच आणायचे. पुन्हा दुसरा किराणा आणायचा तर पैसे नसायचे. कधी कधी आठवड्याचे ३० रुपये आणून मी मांडणीत पितळी बारीक डब्यात ठेवायचो तर कोणीतरी त्यावर हात मारायचे. मग आठवडाभर काय खावे अशी विवंचना असायची.

       तेव्हा काॅलेजला जायला मी मोठ्या हौसेने पांढरा सफारी शिवला होता. वडील पावसाळ्यात तो धुवून घरात वाळत घालायचे तर त्यावर कौलातून टपकणारया गढूळ पाण्याचे टिपके पडायचे.

          मला आठवते. त्या छोट्याशा खोलीत मी अब्राहम लिंकनचा छोटासा फोटो लावलेला होता. तसेच दाराशी हाताची घडी घातलेल्या स्वामी विवेकानंद यांची एक तसबीर होती. पुस्तकांची छोटी रॅक होती. एकदा मला मेनरोडवर एक पोस्टर आवडले ते मी पुस्तकांच्या रॅकजवळ लावले. एक वादळात एका स्त्रीचा तो चेहरा होता. डोळ्यातून अश्रू ओघळत असलेला. कलात्मक म्हणून तो मला आवडला. पण तो खाली पाणी भरता भरता खिडकीतून खाली दिसायचा. ते पोस्टर काढून टाकावे म्हणून एक वर माडीवर येऊन सांगायला लागले तेव्हा मी दुसरे पोस्टर आणून त्यावर चिकटवले. If you live right, ones is enough असे त्यावर वाक्य होते आणि उंचावरुन समुद्रात छलांग मारणारया युवकाची पोज होती.

          घरात चिमणी होती. तिचा काळा धुर निघत रहायचा. वडील कधी कधी पांढरया मातीने भिंती पोचारायचे. जमीन सारवायचे. पाणी खालून आणावे लागायचे. घरात मोरी नव्हती. खाली अंगणात कोपर्‍यात नळाजवळ आडोशाला जावून अंघोळ करावी लागायची. वडील नळावर जाऊन एका हाताने भांडी घासायची तेव्हा सगळे माझ्याकडे वर खाली पाहून कुजबुजायची 'किती दिवस म्हातारयाला भांडी घासायला लावतो' मी खालमानेने सकाळी काॅलेजला जायचो. तेथून दुकानात जायचो. रात्री नऊ वाजता घरी यायचो. सुट्टीच्या दिवशी परशुराम साईखेडकर नाट्यगृहाजवळील सार्वजनिक वाचनालयात जायचो.

        आठवड्याला नंतर नंतर १२५ रुपये उचल मिळायला लागल्यापासून मी पुस्तक प्रदर्शनातून एकेक पुस्तक घरी आणायचो. पाच दहा रुपये किंमत असायची पण त्या काळात त्यांना फार मोल होते. महानोर यांचा रानातल्या कविता, ग्रेस यांच्या सायंकाळच्या कविता हे संग्रह तेव्हा मी आणलेले आठवतात. एकदा विश्वकोश माझ्या नजरेस पडला तेव्हा मी दरमहा एक याप्रमाणे जवळ जवळ सगळेच खंड घरी आणले. पुस्तकांची रॅक तेव्हा कमी पडायला लागली. घरी येणारे नातेवाईक म्हणायचे हा छंद काही उपयोगाचा नाही. वडील तेव्हा रागवायचे नाही

        आई गेल्यावर त्यांनी मला आईची उणीव भासू दिली नाही. आईसारखी माया माझ्यावर केली. कधी मी आजारी पडून घरी राहिलो की माझी चिठ्ठी ते दुकानात नेऊन द्यायचे. माझ्या अंगावर पांघरुन घालून येताना फुटाणे वगैरे आणायचे

       मला आठवते. आई तेव्हा शालिमारजवळ सिव्हिल हाॅस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट होती. तेव्हा ते घरी स्वयंपाक करुन हाॅस्पिटलमध्ये जाऊन शाळेतही जायचे. परत घरी येऊन संध्याकाळी स्वयंपाक करायचे. हाॅस्पिटलमध्ये आई कॅन्सरच्या शेवटच्या स्टेजला होती. तिला ते संत्री मोसंबी सोलून खाऊ घालायचे. आई म्हणायची 'आता माझ्या विलासचे कसे होईल' तेव्हा ते तिला धीर द्यायचे. कॅन्सरवरील महागाचे उपचार करण्याइतपत त्यांची तेव्हा परिस्थिती नव्हती. मी शाळकरी वयाचा. पुरेशी समज न आलेला.

         त्यांची हतबलता तेव्हा मला समजण्यासारखी नव्हती. मी जरा जाऊन येतो असे म्हणून ते हाॅस्पिटलमध्ये जाऊन यायचे. एके दिवशी ते अक्षरशः हंबरडा फोडतच आले. 'आपली पमा आपल्याला सोडून गेली रे' असे म्हणून ते रडतच होते. मला काही समजत नव्हते. मी मनात तेव्हा म्हटले 'बरे झाले गेली. मारतच होती.' आज मला अगदी ओशाळल्यासारखे वाटते.

         तेव्हा आम्ही चरण पादुका रोडला बोराडे यांच्या सीता स्मृती वाड्यात पहिल्या मजल्यावर रहायचो. आईला वडीलांनी टॅक्सीत घालून आणले. तेव्हा नुकतेच जंबुसरवरुन मामा कंपनी घरी आली होती. त्यांनी आणलेला ब्रेड लाकडी कपाटात तसाच पडलेला होता.

         आईला हिरव्या लुगड्यात सजवण्यात आले. हिरवा चुडा भरण्यात आला. तोंडात पानाचा विडा ठेवण्यात आला. तिला घेऊन यात्रा निघाली तेव्हा वडील भाऊ पुढे विस्तव घेऊन चालत होता.

         आईला सरणावर ठेवण्यात आले तेव्हा मात्र मला वेगळीच जाणीव झाली. आई उठत का नाही म्हणून मला एकसारखे वाटायला लागले तोच वडील भावाने आईला अग्नी दिला. खांद्यावर पाण्याच्या मडक्याला दगडाने कोच पाडून पाण्याची धार सांडत सांडत प्रदक्षिणा घातल्या आणि पाठीमागून एके ठिकाणी मडके मागे सोडून दिले. ते फुटले तेव्हा आगीच्या ज्वाळांनी मला भडभडून आले.

          आई आता पुन्हा दिसणार नाही ही जाणीव मला त्या वयात झाली. आई गेल्याचा माझ्या बालमनावर परिणाम होऊ नये म्हणून वडीलांनी पुढे मला फार जपले. ते सारखे माझ्याकडे लक्ष ठेवून असायचे.

            एकटाच खिडकीत बसलो की वडीलांच्या वेगवेगळ्या भावमुद्रा डोळ्यापुढे तरळत राहतात. कधी ते अंगातली कोपरी खिडकीशी उन्हात बसून शिवत बसायचे. तर कधी गुडघ्यावर धोतर शिवत बसायचे. त्यांची लालबुंद गव्हाळ कांती उन्हाच्या तिरीपेत चमकत रहायची. कधी कागदाच्या कपट्यावर शिसपेन्शिलने माझ्या आईचा चेहरा रेखाटत बसायचे. गुडघ्यांसाठी त्यांनी रुमानार्थी आयुर्वेदिक औषधे आणून ठेवलेली असायची ती ते घ्यायचे आणि सकाळी किंवा सायंकाळी वरच्या पेठेपासून ते थेट खालच्या पेठेपर्यंत फेरफटका मारुन यायचे. मध्ये राममंदिर लागले की तेथील ओट्यावर भेळभत्ता घेऊन खायचे. कधी कधी निवृत्त लोक कट्ट्यावर जमायचे तिथे त्यांच्यात जाऊन बसायचे. एकदा त्यांच्या चष्म्याची एक काडी तुटली तर तिथे दोरा लावून तोच चष्मा त्यांनी शेवटपर्यंत वापरला. शेवटी एक काच फुटली तर उरलेल्या काचेतून ते पेपर वगैरे वाचायचे. तो चष्मा जपून ठेवायला हवा होता अशी हळहळ आज वाटते. प्रथेप्रमाणे त्यांच्या वस्तू गंगेत विसर्जित केल्या त्या करायला नको होत्या असे आज वाटते.

          सकाळी अंघोळ केली की ते एका हाताने देवपूजा करायचे आणि कपाळाला गंध लावायचे.

          मोठ्या मुश्किलीने मी त्यांचे निवृत्ती वेतनाचे प्रकरण त्यांचे सेवापुस्तक ज्या शाळेत होते तिथे जाऊन, त्यांचे सन १९५० ते १९७६ चे वेतनाचे तपशील मिळवून करवून घेतले होते. रु ६० निवृत्ती वेतन बसले तेव्हा त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळलेले मी पाहिले होते. ते वाढत जाऊन शेवटी ते रु ७०० इतके निवृत्ती वेतन घ्यायचे. त्याचेही त्यांनी हिस्से ठरवलेले होते. माझ्या हिस्स्याचे पैसे ते घरात द्यायचे व नाशिकला जाऊन माझ्या भाऊ बहीणीला त्यांच्या हिश्श्याचे पैसे कनवटीला ठेवून देऊन यायचे. स्वतः साठी  तंबाखूची पुडी आणि भेळभत्ता एवढाच खर्च भागावता येईल एवढेच पैसे ते जवळ बाळगायचे. नवरात्रात पहाटे कोरा नेहरुशर्ट व कोरे धोतर घालून ते पायीच घाटनदेवीचे दर्शन घेऊन यायचे.

#एक चंदनाची कहानी

              शुभ्र नेहरुशर्ट . शुभ्र धोतर आणि शुभ्र टोपी याच वेशात ज्यांना मी आयुष्यभर पाहिले.ज्यांचे जीवन अगदी साधे सरळ भाबडे आणि तितकेच खडतरही होते.त्या माझ्या वडिलांनी माझ्या आयुष्यातील जवळ जवळ सगळाच भाग व्यापलेला आहे. माझे बालपण, किशोर आणि तरुण वय त्यांच्या सावलीत गेलेले आहे

        रविवार दि १५/४/१९१७ रोजी त्यांच्या जन्माने आनंद झाला म्हणून त्यांचे नाव 'आनंदा' ठेवण्यात आले. त्यांच्या पाठोपाठ यमुना 'दगु' 'मुरलीधर' झाले. नगरसूल गावात शेती होती. लहानपणी आंब्याच्या झाडावरुन पडण्याचे निमित्त झाले आणि वडिल डाव्या हाताने अधू झाले. शेतीच्या कामासाठी कुचकामी ठरले. शेळ्या मेंढ्या सांभाळायच्या कामाचेच फक्त उरले.

        मालेगावच्या मामांनी त्यांना आपल्याकडे शिकायला घेऊन गेले. तिथे व्हर्नाक्युलर फायनल म्हणजे सातवीपर्यंत शिकले. ते सांगायचे तेल्याच्या दुकानात ते दिवसभर तेल विकायचे. मोठे कष्टाचे ते दिवस होते.

      नंतर नाशिकमध्ये पीटीसी केली. खिर्डीसाठे इथे शाळा सुरु केली. पुढे मराठा विद्या प्रसारक मंडळाच्या बाल शिक्षण मंदिर, गोराराम गल्ली नाशिक येथे प्राथमिक शिक्षक म्हणून लागले.

        पहिली पत्नी हाडके घराण्यातील होती. वडील नाशिकमध्ये नोकरी करीत होते तरी ती नगरसूलला शेतीकाम करायची. बाळकृष्ण तीन वर्षाचा असताना व उषाचा नुकताच जन्म झाला तेव्हा ती त्यांना सोडून देवाघरी गेली

       तेव्हा ते पंचवटीत रहायचे. नगरसूलची सकडे आजी भोईरवाड्यात बहिणीकडे यायची. तिने वडीलांना पाहिले. माझी आई तिची भाची. तिच्यासाठी माझे वडील योग्य वाटले. तिने मग लग्न जुळवले.

       तुटपुंज्या पैशात संसार सुरु झाला. पहिल्या पत्नीची मुलं आई सांभाळणार नाही असा त्यांना त्यावेळी सल्ला मिळाल्याने त्यांना त्यांनी आपल्या बहिणीकडे ठेवले. आईला तिच गोष्ट मनस्वी लागली. वडील पगारातून त्या दोन मुलांचा संभाळ करण्यासाठी बहिणीला वरचेवर पैसे द्यायचे त्यामुळे घरात चणचण भासायची. त्यावरुन आई बाबा यांच्यात नेहमी खटके उडायचे.

       आई आणि बाबा यांच्या वयातही खूप अंतर होते. आई वयाने लहान सुंदर होती. सगळ्यांमध्ये उजवी होती. त्यामुळे तिचा सगळ्यांकडून दु:श्वास होत रहायचा. कोणी आईला चांगले पहायचे नाही. तिने खालुन वाहून आणलेल्या प्यायच्या पाण्यात आधीची मुलगी राख टाकून द्यायची. खणदूसपणे वागायची

        बाबांचा आईवर खूप जीव होता. तिचा संताप राग सहन करुन घ्यायचे. आई रागावली की बाबा घराबाहेर निघून जायचे.

             शुक्रवार दि १५फेब्रुवारी, १९७४ रोजी आई कॅन्सरने गेली तेव्हा वडील एकटे पडले. घरातला स्वयंपाक पाणी एका हाताने करुन ते शाळेत जायचे. घरातली भांडी ते एका हाताने घासायचे. मी तेव्हा आठवीला होतो. असमंजस आणि हट्टी होतो. एकदा दारावर लाकडी टेबल विकायला आले तर मला अभ्यासाला वडीलांनी घेऊन दिले. टेबलाला खुर्ची पाहिजे म्हणून मी हट्ट धरला तर वडीलांनी मला फर्निचरच्या दुकानात नेऊन माझ्या पसंतीने घडीची लाकडी खुर्ची घेऊन दिली. खुर्ची घेऊन आम्ही रामसेतू पुलावरुन येत होतो तेव्हा श्रीराम विद्यालयाचे तेव्हाचे मुख्याध्यापक श्री टेकाडे गुरुजी भेटले. ते माझ्याकडे पाहून म्हणाले गुरुजींना किती त्रास देतो.

        एकदा हट्ट करुन मी बाबांना किशोर मासिक घ्यायला लावले होते. दोन रुपये किंमत होती तरी तेव्हा ते महागच होते. तेवढ्या किमतीत तेव्हा दोन तीन किलो गहू मिळायचा.

        बाबा जून १९७६ मध्ये सेवानिवृत्त झाले. त्या आधी फंडातून पैसे काढून उषाचं लग्न करुन दिले. सेवानिवृत्त झाले पण पेन्शन नाही. खासगी संस्थेत तेव्हा पेन्शन नव्हते. घरातले एकेक पितळी भांडे कुंडे विकून एकेक दिवस कसाबसा चालला होता. तेव्हा आम्ही दोघेच लाटेवाड्यातच पण आतेमामांच्या शेजारी रहायचो. आतेमामांनी आत्या गेल्यानंतर दुसरे गंधर्व लग्न केले होते. बाळकृष्ण आणि उषा तेव्हा आतेमामांकडेच रहायचे. उषाच्या लग्नात जेवण कमी पडले तर आतेमामाने आईच्या हातची मोठी पंचपात्री ठेवून घेतली व पैसे पुरवले तेव्हा पंगतीत वाढता आले.

            सणासुदीला इकडे आम्ही दोघे आज काय खायचे या विवंचनेत असायचो तर शेजारी मोठमोठ्याने मामा श्रीखंड काय मस्त आहे असे मुद्दाम आवाज यायचे. आतेमामाने बाळकृष्णाला मालविय चौकात रथ रस्त्याच्या कोपर्‍यावर पानपट्टी टाकून दिली होती. कधी कधी मीही त्या पानपट्टीवर बसायचो.                                                                    सेवानिवृत्त झाल्यावर उत्पन्नाचे कोणतेही साधन नव्हते. तेव्हा आतेमामाने पंचवटी कारंजावरील एक पानपट्टी बाबांना चालवायला दिली. तेव्हा मी दहावीत गेलेलो होतो. पानपट्टीच्या माळ्यावर व घरी रात्री आल्यावर रस्त्यावरील लाईटच्या उजेडात मी अभ्यास करायचो. घरात लाईट नव्हती. चिमणीच्या उजेडात आम्ही रहायचो.

           खूप जणांनी उधारी बुडवल्याने पानपट्टीही चालली नाही. मग बाबा चार रुपये रोजाने द्राक्षाच्या बागेत रात्री राखणदारी करायला तपोवनाकडे जायचे. येताना जाळण्यासाठी रानातून काड्याकुड्या गोळा करुन आणायचे. एकदा आतेमामाने त्यांच्याकडील कोरिया जपानची भारी पॅन्ट घालायला दिली आणि दुसरया दिवशी मागूनही घेतली होती. सकाळी गाणगापूरहून आणलेल्या सोन्याच्या साखळ्यांच्या गप्पाही कधी कधी ऐकू यायच्या.

         मी दहावीत गेलो तेव्हा एकमुखी दत्ताकडे रहात असलेल्या पिसोळकर सरांनी त्यांची जुनी खाकी फुलपॅन्ट जी मागे सीटवर विरली होती ती देऊन ठिगळ लावून वापर असे सांगितले होते.

        अशा एकेक आठवणी आज जाग्या होत आहेत.

४.

#एक चंदनाची कहानी

              तो काळच वेगळा होता. आज तो धूसर सोनेरी भासत आहे. पावसाळ्यात वडील घरी यायचे तेव्हा मोठी बंद छत्री ते दाराच्या पाठीमागे उभी करुन ठेवायचे. धोतर वर पोटरयांवर खोचलेले असायचे. 'काय शिळंदार पाऊस' असे अंगभर ओले कपडे झटकत म्हणायचे. 'जरा पल्याड जाऊन येतो' म्हणून टोपी चढवून ते निघायचे. एकदा मला त्यांनी गोदावरी पलिकडे यशवंतराव पटांगणातून चढ असलेल्या मार्गाने त्यांच्या शाळेत नेले होते. बाल शिक्षण मंदिर ही गोराराम गल्लीतील शाळा भरायची तो एक वाडाच होता. वर्गात मुलं जमीनीवर बसकर पट्ट्या टाकून बसायचे. दर शनिवारी वर्ग सारवायचे. वडील उत्तम चित्रकार होते. बालभारतीच्या इयत्ता पहिलीच्या पुस्तकातील रंगीत चित्रे त्यांनी हुबेहुब त्याच रंगात रंगवून वर्गात लावली होती. तेव्हाच्या लोकराज्य वगैरे मासिकातील चित्रे, पक्षांची पिसे, राजा रवीवर्माने काढलेल्या श्रीकृष्णाची चित्रे यांचा सुंदर चित्र संग्रह त्यांनी बनवलेला होता. इयत्ता तिसरीच्या बालभारतीच्या पुस्तकातील शिवाराची श्रीमंती, जत्रा, माझ्या मामाची रंगीत गाडी इत्यादी धडे कवितांची त्यांनी आपल्या वळणदार निळ्या अक्षरात काढलेली टिपणवही मी अजून जपून ठेवली आहे. त्यांचे अक्षर मोत्यासारखे टपोरे सुंदर होते. एका वहीत माकडा माकडा कान कर वाकडा सारख्या बडबड गीतांचा त्यांनी स्वअक्षरात केलेला संग्रह देखील मी जपून ठेवला आहे. मोडीमध्ये त्यांची आ गो कुडके ही स्वाक्षरी सर्वत्र असायची.

          शाळेतून सायंकाळी परतताना ते हमखास मालविय चौकातून मोठी बालुशाही घेऊन यायचे.

          मला घेऊन ते शाळेत जायचे तेव्हा दुपारच्या सुट्टीत सुंदरनारायण मंदिराजवळील त्यांच्याच एका विद्यार्थ्याच्या हाॅटेलमध्ये घेऊन जायचे व मस्त गोल भजी खाऊ घालायचे.वर्गात ते शिकवायचे तेव्हा विद्यार्थ्यांमध्ये त्यांचा अगदी धाक होता. चुकले की त्यांच्याकडून जोरात गुद्दा मिळायचा. कधी कधी तर ते कानही अगदी लाल होईपर्यंत पिळायचे. पाढे बाराखडी धडे कविता ते अगदी घटवून घ्यायचे. मुलांचे पालक शाळेत आले की ते वडीलांशी अगदी घरच्यासारखे बोलायचे. वडील त्या शाळेचे कीर्द खतावणी सुद्धा लिहायचे. स्व. खासदार वसंत पवार हे त्यांचे विद्यार्थी होते. सेवानिवृत्त शिक्षकांचा सत्कार करण्यात आला तेव्हा वडील ८७ वयाचे होते. तेव्हा स्व. खासदार वसंत पवार त्यांना म्हणाले 'मला ओळखले का गुरुजी, मी तुमचा विद्यार्थी, तुम्ही माझा कान पिळला होता.' वडीलांनी आठवून आठवून मग मान हलवली होती.

         बाल शिक्षण मंदिर या शाळेत मागील बाजूस एक दगडी चौक होता. तिथे सुतकताईचे चरखे असायचे. मोठ्या वर्गातील मुलांना ते सुतकताई सुद्धा शिकवायचे. अशा कितीतरी आठवणी जाग्या झाल्या आहेत.

@विलास आनंदा कुडके 

Wednesday, June 9, 2021

फजितीचे क्षण

 फजितीचे क्षण

    काही क्षण फजितीचे असतात. असे क्षण प्रत्येकाच्याच आयुष्यात कधी ना कधी आलेलेच असतात. त्या क्षणापुरते आपल्याला वाटते आपली फजिती झालेली कोणीही पाहू नये. फजिती होत असतांनाचा क्षण युगासारखा वाटायला लागतो. कधी एकदाचा तो क्षण संपावा आणि आपण सुटकेचा नि:श्वास टाकावा असे होऊन जाते. असे क्षण आपण आयुष्यातून घाईघाईने पुसून टाकू पाहतो. आजवर लिहिल्या गेलेल्या आत्मचरित्रात कोणीही फजितीचे क्षण उल्लेखिलेले आढळत नाही. काही अपवाद असतीलही पण अशी आत्मचरित्रे अद्यापही वाचनात आलेली नाहीत.

    प्रत्येक जण आपले व्यक्त्तिमत्व अगदी रांगत असल्यापासून विकसित करीत असतो. आपलं रुपडं सजवित असतो. कोणावरही छाप पडेल अशी देहबोली, शैली आपण आत्मसात करीत असतो. आपल्याला पाहून कोणीही आकर्षित व्हावे, राजस, राजबिंडे, देखणे म्हणावे म्हणून सारी आपली धडपड असते. आवडत्या हिरोचे राहणीमानाचे आपण अनुकरण करतो. काही स्वत:च इतरांचे आदर्श बनू ठरू पाहतात. अशावेळी फजितीचे क्षण म्हणजे दुधात खडा! अशा फजितीच्या क्षणी त्रिफळा उडते तेव्हा आपला झालेला अवतार पाहण्यासारखा असतो पण आपण स्वत:ही आरशात तो कधी पहाण्याचे टाळतो. कोणीजर चुकून पाहिले तर जणू काही त्याने पाहिलेच नाही अशी मनाची खोटी समजूत करुन घेतो.

    कल्पना करा एखाद्या खास कार्यक्रमासाठी महागड्या सौंदर्यप्रसाधनगृहात नखशिखांत शृंगारलेली ललना ऐनवेळी तिच्या पायातील त्राणीचा अंगठा नाहीतर बंध तुटला तर कोण घोर प्रसंग उभा राहिल. अशा साजशृंगारलेल्या अवस्थेत दुरुस्तीच्या दुकानापुढे उभे राहायचे म्हणजे किती नामुष्कीचा प्रसंग. शत्रूस्त्रीवर सुद्धा असा प्रसंग नको यायला किंवा धरणीमाय पोटात घेईल तर बरे होईल असे तिला क्षणभर वाटल्याशिवाय राहणार नाही. बरं ती तुटकी पादत्राणी तशीच सोडून जावे तर कोमल पावले भूमीवर ठेवावी कशी? अशा पेचात ती बिचारी सापडते. बरे अशा ललनांकडे दुर्लक्ष कोण करणार आणि ही फजिती लपवणार तरी कोणाकोणापासून. मरुन मेल्यासारखी अवस्था म्हणतात ती हीच असते.

    असाच जीवघेणा क्षण धो धो पावसात अजिबात उघडत नसलेल्या छत्रीमुळे येतो. ऐरवी पाऊस नसताना किती छान उघडत होती आणि आताच हिला काय झाले म्हणून आपली किती झटापट होत रहाते. बरं अशा न उघडलेल्या छत्रीला त्यावेळी फेकताही येत नाही. वेडी आशा वेडी म्हणजे किती वेडी असते ते आपल्या अशी छत्री उघडण्याच्या निष्फळ प्रयत्नांवरुन आणि पूर्ण भिजलेल्या कपड्यांवरुन कोणाच्याही लक्षात येते. अशावेळी येणारा जाणारा जणुकाही आपल्याचकडे पाहून हसतोय असा भास होत राहतो आणि आपण त्याच्याकडे आपले जळजळते कटाक्ष टाकत राहतो. 

    ऐन पावसात वाऱ्याने छत्री उलटी होणे, काडी न काडी मोकळी होणे ही तर फटफजिती झाली. माणूस केळाच्या सालीवरुन पडला तर साधीच फजिती होते. किमान हसणारा माणूस हसू दाबून मदतीचा एक हात तरी पुढे करुन पडलेल्याला उठवतो आणि केळीचे साल टाकणाऱ्याचा उद्धार करीत शिव्याही घालू लागतो. फार पूर्वी अहो तुमचे पोस्ट ऑफिस उघडे आहे असे सांगून न कळत फजिती करायचा आणि आपला चेहरा गोरा करुन टाकायचा. अशावेळी थँक्सही म्हणायचे अगदी जीवावर येते. बरं, सांगणाऱ्याचा चेहरा न बोलता सांगत असतो की किती अजागळ! एक घडलेला प्रसंग. कार्यालय सुटल्यावर मागे बॅग अडकावून निघालेल्या एका सहकाऱ्याला एका सहकारिणीने मागून आवाज दिला सर तुमची चैन उघडी आहे . तिला बॅगची चैन अभिप्रेत होती. पण सहकारी बिचकले आणि कमाल आहे मागून पुढची चैन कशी दिसेल? असे म्हणून घाईघाईने पँटची चैन चाचपडून पाहली. चैन तर बरोबर आहे, यांना नेमकी कोणती चैन उघडी दिसली, या विचारात त्यांची अगदी घालमेल झाली. पुढे खुलासा झाला ती गोष्ट वेगळी. परंतु त्यावेळी त्यांची जी फजिती झाली ती विचारता सोय नाही. आजकाल ऐनवेळी न खुलणाऱ्या किंवा अजिबात न लागणाऱ्या चैनींमुळे फार मोठा घोटाळा होतो. जड बॅगेचा पट्टा तुटण्यासारखी फजितीच नाही. वरची गुंडीही गळ्यापर्यंत लावण्याची सवय असलेल्याला ऐनवेळी वरची गुंडी तुटल्यावर छातीवरचे केस वाऱ्यावर भुरभुरत उघडे ठेवताना ज्या मरणप्राय यातना होतात त्या तुम्हा आम्हा गुंड्या उघड्या ठेवणाऱ्यांना कळायच्या नाहीत. एवढेच कशाला रस्त्याने मिशी पिळत जायची सवय असलेल्याची मिशी चुकून भादरली गेली तर काय जीवघेणा अपमानास्पद, लांछनास्पद प्रसंग उभा राहतो त्याची तुम्हाला कल्पना येणार नाही. हवी तशी मिशा उगवायला वेळ लागतो, मेहनत लागते, तेवढे दिवस तोंडाला रुमाल बांधूनही वावरता येत नाही. फारच कठीण अवस्था असते. अशा छोट्यामोठ्या फजितीच्या क्षणांना आपण पावलंपावलं जपतच राहतो. रात्रंदिवस घोकंपट्टी करुन परीक्षेला जावं आणि येत असूनही वेळेवर उत्तरच न सुचणे किंवा मोठ्या तावातावाने भाषण करायला ध्वनीक्षेपक घेऊन उभे रहावे आणि ऐनवेळी काय बोलावे हेच न सुचणे... किती किती फजितीचे क्षण सांगावे. मोठ्या प्रेमाने मोठ्या हॉटेलात कोणाला घेऊन जावे आणि पैशाचे पाकीट एटीएम कार्डसकट कोणी मारावे यासारखा दैवदुर्विलास नाही! 

राष्ट्रीय कार्यक्रमाला कांजी लावून कडक इस्तरीत पांढरेशुभ्र होऊन जावे आणि खिशातील कलमानेच घात करावा, ही फजिती कोणती म्हणावी? किती वेळ शाईचा डाग हाताच्या पंजाने लपवून ठेवणार! बरं एवढ्याशा कारणावरुन कार्यक्रम सोडूनही जाता येत नाही. 

एखाद्याने मोठ्या त्वेषाने दातओंठ खावून यावे आणि त्यातच त्याचा पुढचा दात निखळून पडावा, असेही अप्रिय प्रसंग घडतात. दाढ उठलेल्या माणसाला नेमके हसवणारे इतके लोक येऊन भेटतात आणि हसायला भाग पाडतात की विचारु नका! त्यामुळे त्याची अक्षरश: हसून हसून पुरेवाट होते. 

फजिती ज्याची होते त्याला धड हसताही येत नाही आणि रडताही येत नाही. रेडिमेड कपड्यांच्या दुकानातून काही पँटी घेतेवेळी बरोबर येतात आणि वापरायला सुरु केली त्याच दिवशी त्यांची नको तिथे शिलाई उसवल्यावर दे माय धरणी ठाय असे होऊन जाते. म्हणूनच आपण खात्रीशीर न उसवणारी शिलाई मारणाऱ्याकडूनच कपडे शिवत राहतो. बोटाने शिलाई उसवली तर जात नाही ना ते दहावेळा पाहतो. शिलाई उसवणे हे तर फजितीचे हमखास कारण. पूर्वी लोक टोपीमध्ये आतून सुई टोचून ठेवायचे. ती अनेकोपयोगी असायची म्हणजे पायात काटा घुसला, शिलाई उसवली, माळ ओवायची असेल किंवा संरक्षक छोटे शस्त्र म्हणूनही उपयोगी पडायची. 

शाळेत असतांना काही इब्लीस पोरं गुरुजी वर्गात यायच्या आधी त्यांच्या खुर्चीवर खाजकुहली पसरून ठेवायचे आणि मग गंभीर चेहऱ्याने शिकवता-शिकवता गुरुजींच्या ज्या हालचाली सुरु व्हायच्या त्या पाहून वर्ग खुसूखुसू न कळत हसत राहायचा. असली फजिती मात्र व्हायला नको आणि ती कोणी करायलाही नको. प्रवासात देखील मित्रमंडळींमध्ये गप्पांमध्ये रंगलेल्या एखाद्या मित्राला मागून शेपटी लावण्याचे प्रकार होतात किंवा मी गाढव आहे असे लेबल चिकटवले जाते आणि मग त्याच्याशी गंभीर चेहऱ्याने गप्पा मारल्या जातात. आजुबाजूचे लोक मात्र लोटपोट होऊन हसत असतात. अशावेळी हसण्याचे कारण कळाल्यावर जी फजिती होते ती कोणालाही विसरता न येणारी असते. 

चारचौघात जशी फजिती होत असेत तशी ती घरात काहीवेळा होत असते. म्हणतात ना शिंक्यावर झेप घ्यायच्या प्रयत्नात शिंकेच तुटावे आणि ज्याच्यासाठी जीव चालला होता, सगळा आटापीटा होता ते दही दूध सहज अंगावर अभिषेक होऊन मिळावे आणि हा आनंद म्हणायचा की दु:ख ते समजत नसताना अंगावरचेही घाईघाईने चाटून पुसून घ्यायची वेळ यावी आणि तोंडात ना ओठात पडता वाढून गेलेल्याकडे पाहून हळहळत बसावे तसे सगळे असते.

घरोघरी गॅसच्या शेगड्या तसे घरोघरी अडगळ, पसारा हा ठरलेलाच असतो. त्यात घरात वावरणारे आताशा भ्रमणध्वनीत व्यस्त असल्याने घरातील पसारा पूर्वीच्या मानाने खूप वाढला आहे आणि आवरणारे हात शोधावे लागत आहेत. पूर्वी हौसेने घर आवरले जायचे पण आज हौस जिरेल एवढा पसारा वाढला आहे कारण जीवनावश्यक गरजांबरोबर इतरही गरजाही वाढल्या आहेत. हे सर्वांना कळते पण जरा कुठे आपण कोणाकडे पाहुणे म्हणून गेलो की आपण तिथला पसारा पाहून डोळे विस्फारतो. तेच जर आपल्या घरी पाहुणे येणार असतील तर आपल्या पायाखालची फरशीच सरकते. पसारा आणि तोही पाहुणे यायच्या आत आवरतांना आपली भंबेरीच उडते. भंबेरीवरुन एक गोष्ट आठवली. शाळा तपासायला दिपोटी अचानक आल्यावर आपल्याच नादात संजिवनी  मळणाऱ्या गुरुजींची बोबडी वळली. त्यांनी घाईघाईने संजिवनी टेबलाच्या ड्रावरमध्ये आणि टेबलावरची शाईची दौत खिडकीतून बाहेर फेकली, असा फजितीचा क्षण!

असेच एक विभागीय प्रमुख अधिकारी होते. त्यांच्याकडे अचानक विभागप्रमुख चक्क जिन्सची पॅन्ट आणि टी-शर्टवर एकट्याने भेट दिली. शिपायाने त्यांना अजिबात ओळखले नाही. त्यांना सरळ बाकड्यावर बसायला सांगून साहेब बिझी आहे असे सुनावले. झाले. विभागप्रमुख बराचवेळ बाकड्यावर साहेब कधी मोकळे होतात त्याची वाट पहात गाणे गुणगुणत बसले. त्यावरही शिपायांनी त्यांना शांतता पाळायला सांगितली. शेवटी त्यांनी विचारले, तुमचे साहेब कितीवेळ बिझी असतात  आणि तडक दालनाचा दरवाजा उघडून शिपाई अरे अरे  म्हणेपर्यंत आत शिरले तर विभागीय प्रमुख अधिकारी धुम्रपानात धुरांच्या वलयात पुढील पदोन्नतीचे स्वप्न पाहण्यात तल्लीन झालेले! काय रे विड्या ओढतोस का? या प्रश्नाने स्वप्नभंग झाला आणि डोळ्यासमोर साक्षात मृत्यू दिसावा अशा मुद्रेने क्षणात ते अधिकारी गलितगात्र झाले. हातातले सिगारेट केव्हा गळून पडले ते त्यांचे त्यांनाही कळले नाही. विभागप्रमुख निघून गेल्यानंतर जवळजवळ तासाभराने त्यांना आपण कोठे आहोत त्याची जाणीव झाली आणि मग या फजितीला कारणीभूत ठरलेल्या शिपायाला त्यांनी किती झापले असेल ते विचारायलाच नको!

@ विलास आनंदा  कुडके

अवघाची वेळ सुखाने घालवीन

 #अवघाची वेळ सुखाने घालवीन          वेळ घालवण्याचा प्रसंग  तुमच्यावर कधी आला आहे का ? कदाचित एकदम आठवणार नाही पण आपला क्रमांक येईपर्यंत, अपे...