जुनी अकरावी मॅट्रिक परीक्षा जाऊन नवीन दहावी एस एस सी परीक्षा १९७५ साली सुरु झाली. तेव्हाचे अकरावीचे 'विज्ञान परिचय' मोठे पुस्तक कुतुहल म्हणून मी आधीच हाताळले होते. मला ते फार आवडले होते. पुढे विज्ञान शाखेत जायचे म्हणून मी ते पुस्तक मन लावून वाचून काढले होते. ग्रंथालयातून विज्ञानावरील एकेक पुस्तक आणून त्या काळात वाचली. त्याकाळात स्वस्त वह्या ४०, ८० पैशात कारखान्यात मिळायच्या. त्यात मी अवांतर विज्ञानाच्या पुस्तकातून टिपणे काढायचो. हा छंद दहावीला जाईपर्यंत होता. दहावीची परीक्षा मार्च १९७७ मध्ये दिली. तेव्हा पेपर कडक तपासले जातात. मराठीच्या पेपरमध्ये पैकीच्यापैकी गुण देत नाही अशी चर्चा असायची. त्यामुळे सगळे धास्तावलेले असायचे. निकालाचा दिवस उजाडला की सगळे गल्लीतील मारुती मंदिरात प्रदक्षिणा घालून मगच शाळेत धडधडत्या अंत:करणाने जायचे. जाण्यापूर्वी पेपरवाला 'दहावीचा निकाल' असा पुकारा करत गल्लीगल्लीत ओरडत जायचा. १० पैशांचा पेपर घाईघाईने घेऊन सगळ्यांच्या नजरा चुकवून कोपर्यात जाऊन जो तो आपला क्रमांक पास नापास यादीतून हुडकून काढायचा. पास असेल तर भोलेहरच्या दुकानातून जाता जाताच पेढे घेऊन निकाल घ्यायला जो तो शाळेत जायचा. कारण निकाल घरी घेऊन येईपर्यंत पेढे संपून गेले तर अशी भिती वाटायची.
मीही असाच निकालाच्या दिवशी उठलो. दहावीचा निकाल असे ओरडत पेपरवाला गल्लीत फिरत होता. मात्र कोणीच शाळेत निकाल घ्यायला जाताना दिसत नव्हते. हे पाहून मी मनात धास्तावलो. गल्लीत म्हणे एकच पोरगं पास झाल्याची चर्चा होती.बाकी सगळे फेल झाले होते. त्यामुळे १० पैशांचा पेपर घ्यायला जीव धजेवेना. न जाणो फेल झालो तर पेपरचे १० पैसे फुकट जातील असे वाटून गेले. मी घराबाहेरच पडलो नाही. नंतर कळाले तो गल्लीतला पास झालेला एक मुलगा म्हणजे मिच आहे. मग काय गल्लीभर माझ्याच नावाची चर्चा.
मी पास झाल्याचे कळाल्यावर सुटकेचा नि:श्वास टाकला आणि भोलेहरच्या दुकानातून रुपयाचे पेढे घेऊन शाळेत निकाल आणायला गेलो. चांगले ६१.४ %गुण मिळाले होते. आज हे सर्व आठवते तर हसू येते
@विलास आनंदा कुडके
No comments:
Post a Comment